मुंबई, – राज्याने करोनाचा मुकाबला करण्यासाठी अतिशय गांभीर्याने आणि पारदर्शकपणे पावले उचलल्याने दर दशलक्ष लोकसंख्येचा विचार करता करोनाचा जास्त प्रादुर्भाव असलेल्या राज्यांच्या तुलनेत करोना वाढीचा वेग किंवा मृत्यूदर महाराष्ट्रात कमी आहे, अशी माहिती आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे.
2 फेब्रुवारी 2021च्या आकडेवारीनुसार दर दशलक्ष लोकसंख्येत दिल्लीत 37 हजार 844, गोव्यात 36 हजार 732, पौंडेचरीत 31 हजार 350, केरळमध्ये 28 हजार 89, चंडीगडमध्ये 19 हजार 877 इतके पॉझिटिव्ह रुग्ण होते. त्यामानाने महाराष्ट्रात यादिवशी 16 हजार 8 रुग्ण होते.
महाराष्ट्राने वेळोवेळी आयसीएमआर आणि जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या निर्देशांचे तंतोतंत पालन केले. महाराष्ट्राच्या या प्रयत्नांचे आंतरराष्ट्रीय संस्थांनीदेखील कौतुक केले. अगदी यासंदर्भातील माहिती अद्ययावत करताना पूर्वीचे जे मृत्यू करोनामुळे झाले होते पण त्याची नोंद झाली नव्हती अशा सुमारे हजारभर मृत्यूची नोंद पारदर्शकपणे करण्यात आली.
एकूण मृत्यूंची संख्या महाराष्ट्रात जास्त असली तरी दर दशलक्ष लोकसंख्येत मृत्यूचे प्रमाण इतर राज्याच्या तुलनेत कमी आहे. 2 फेब्रुवारी 2021 रोजीच्या आकडेवारीनुसार दिल्लीत 647, गोव्यामध्ये 527, पौंडेचरीत 522, आणि महाराष्ट्रात 403 मृत्यू झाले.
करोनाच्या वाढत्या दराचा विचार केला तर 3 फेब्रुवारीच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात दररोजचा कोविड वाढता दर होता 0.10% तर केरळचा दर महाराष्ट्रापेक्षा सहापट जास्त म्हणजे 0.61%, गोवा 0.2%, पंजाब 0.12%, गुजरात आणि छत्तीसगड 0.11% असा दर होता.
चौकट
करोनाच्या परिस्थितीवर नियंत्रण
सक्रिय रुग्णाबाबत महाराष्ट्रात दर दशलक्ष लोकसंख्येत 290 रुग्ण असताना केरळमध्ये 2000 पेक्षा जास्त सक्रिय रुग्ण आज आहेत. महाराष्ट्रात विशेषत: मुंबई, पुणे अशा मोठ्या शहरांत इतर देशातून येणाऱ्या प्रवाशांची संख्या पूर्वीपासूनच कितीतरी जास्त आहे. शिवाय लोकसंख्येची घनता आणि शहरीकरण इतर राज्यांच्या तुलनेत जास्त आहे. असे असूनही दर दशलक्ष लोकसंख्येत दररोज आढळणारे करोनाचे रुग्ण, बरे होणारे रुग्ण आणि त्या तुलनेत कमी होत असलेले मृत्यू याची सांगड घातली तर महाराष्ट्राने उचललेल्या पावलांमुळे करोना परिस्थितीवर नियंत्रण मिळविल्याचे स्पष्ट होत आहे.