चेन्नई – इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत भारतीय संघाचा पहिला डाव 337 धावांवर संपुष्टात आला. 578 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताच्या प्रमुख फलंदाजांच्या सुमार फलंदाजीमुळे इंग्लंडला पहिल्या डावात 241 धावांची मोठी आघाडी मिळाली. इंग्लंडचा दुसरा डाव रवीचंद्रन अश्विनच्या अफलातून गोलंदाजीच्या जोरावर केवळ 178 धावांवर संपला व भारतासमोर विजयासाठी 420 धावा करण्याचे आव्हान उभे राहिले आहे.
हा सामना वाचवण्यासाठी किंवा जिंकण्यासाठी भारताला नव्या रननीतीची गरज आहे. सोमवारी चौथ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा भारताने आपल्या दुसऱ्या डावात 1 गडी गमावून 39 धावा केल्या असून विजयासाठी त्यांना अद्याप 381 धावांची आवश्यकता आहे. रोहित शर्मा बाद होऊन परतला असून खेळपट्टीवर शुभमन गिल 15 तर, चेतेश्वर पुजारा 12 धावांवर खेळत आहेत.
दरम्यान, आज भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माने कसोटी कारकिर्दीत 300 गडी बाद करण्याची कामगिरी केली. भारताकडून कसोटीत हा पल्ला गाठणारा इशांत तिसरा वेगवान भारतीय गोलंदाज ठरला.
इशांतच्यापूर्वी महान वेगवान गोलंदाज कपिल देव व झहीर खान यांनी ही कामगिरी केली आहे. चेन्नई येथे सुरु असलेल्या कसोटी सामन्यात इशांतने लॉरेन्सला बाद करत दमदार कामगिरी केली. इशांतने 98 व्या कसोटी सामन्यात हा टप्पा ओलांडला.