मुंबई : भाजप सरकारच्या कार्यकाळात प्लास्टिकमुक्त महाराष्ट्रासाठी पुढाकार घेणारे युवासेना प्रमुख व आताचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा प्लॅस्टिकबंदीचा नारा दिला आहे.
येत्या 1 मे रोजी महाराष्ट्र राज्य स्थापनेला 60 वर्ष होत आहेत. त्यापाश्वभूमीवर महाराष्ट्र दिनापर्यंत राज्यातील सर्व महापालिका, नगरपालिका, ग्रामीण भाग “सिंगल यूज’ प्लास्टिकमुक्त करा, असे निर्देश त्यांनी राज्यातील विभागीय आयुक्त, महापालिका आयुक्त व जिल्हाधिकारी यांना दिले आहेत. त्यासंदर्भात राज्यात जनजागृती मोहिम व प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नियोजन करावे, अशी सूचनाही त्यांनी केली आहे.
“सिंगल यूज’ प्लास्टिकमुक्त महाराष्ट्रासाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज राज्यातील विभागीय आयुक्त, महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्यांशी व्हिडियो कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. राज्य शासनाने प्लास्टिक बंदी केली असून या कामात लोकांचा सहभाग महत्त्वाचा आहे.
त्यामुळे या मोहीमेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांनी शालेय विद्यार्थी, महाविद्यालये, एनएसएस, स्काऊटस् ऍन्ड गाईडस् स्पोर्टस क्लब, हाऊसिंग सोसायट्या, रोटरी क्लब, लायन्स क्लब, एनजीओ अशा विविध संस्थांचा सहभाग घेऊन याला लोकचळवळीचे स्वरुप देण्यात यावे. तसेच प्लास्टिकचे घातक परिणाम लोकांना समजावून सांगावे.
यासाठी प्रत्येक महापालिका, नगरपालिका काय करू शकते याचा आराखडा येत्या 20 फेब्रुवारीपर्यंत सादर करावा, असे निर्देश आदित्य ठाकरे यांनी अधिकाछयांना दिले. सर्व आराखड्यांचा सर्वकष विचार करून संपूर्ण राज्य “सिंगल यूज’ प्लास्टिकमुक्त करण्याचे नियोजन करण्यात येईल.
यासाठी 1 मार्चला राज्यस्तरिय परिषद किंवा बैठक घेवून मार्च आणि एप्रिलमध्ये राज्यभरात मोठी जनजागृती मोहीम तसेच प्लास्टिकबंदीची प्रभावी अंमलबजावणी करून 1 मे पूर्वी संपूर्ण राज्य सिंगल यूज प्लास्टिकमुक्त होईल यादृष्टीने नियोजन करावे, अशा सूचना ठाकरे यांनी यावेळी केल्या.