नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकताच मांडलेला अर्थसंकल्प जनहितविरोधी आहे. त्यामुळे बहुतांश जनतेचे जगणे आणखी खडतर बनणार असल्याचा दावा डाव्या पक्षांनी केला आहे. त्यातून अर्थसंकल्पाविरोधात 12 ते 18 फेब्रुवारी या कालावधीत देशव्यापी निदर्शने करण्याचा निर्णय डाव्यांनी घेतला आहे.
मोदी सरकारने देशाची अर्थव्यवस्था अडचणीत आणली आहे. एकीकडे सामान्य जनतेवर मोठा भार टाकला जात आहे. तर दुसरीकडे श्रीमंतांना सवलतींमागून सवलती दिल्या जात आहेत.
त्यामुळे आर्थिक विषमता सर्वोच्च स्तरावर पोहचली असल्याचे टीकास्त्र डाव्या पक्षांनी सोडले आहे. निदर्शनांवेळी राष्ट्रीय मालमत्तांचे खासगीकरण मागे घेण्याची मागणी केली जाणार आहे. त्याशिवाय, कृषि क्षेत्रातील समस्यांकडेही लक्ष वेधले जाणार आहे.