माण- खटाव निवडणुकीसाठी 18 अर्ज दाखल; प्रत्येक उमेदवाराचे शक्तीप्रदर्शन
गोंदवले – माण- खटाव विधानसभा मतदारसंघात आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी विविध उमेदवारांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करीत आपले उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी अश्विनी जिरंगे यांच्याकडे दाखल केले. यावेळी उमेदवारांनी केलेल्या धडाकेबाज शक्तीप्रर्दनामुळे दहिवडी शहराला अक्षरशः जत्रेचे स्वरुप आल्याचे दिसून आले. जिकडे पाहवे, तिकडे लोकच लोक, असे चित्र निर्माण झाल्याने दहिवडी शहरात जनसागर उसळल्याचे आज होते.
माण- खटाव विधानसभा मतदारसंघ यंदाही अतिशय हॉट बनला असून आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेनेकडून शेखर गोरे, वंचित बहुजन आघाडीकडून डॉ. प्रमोद गावडे तर “आमचं ठरलयं’ मधून माजी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, अनिल देसाई व रणजितसिंह देशमुख या सर्व उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज भरताना जोरदार केलेले शक्तीप्रदर्शन पाहता यंदाची निवडणूक कोणालाच सोपी नसल्याचे दाखवून दिले. या निवडणुकीसाठी दि. 3 रोजी माणचे माजी आ. जयकुमार गोरे यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करताना “फिर एकबार जयकुमार’ अशी हाक दिली. तर आज त्यांचेच छोटे बंधू शेखर गोरे यांनीही जोरदार शक्तीप्रदर्शन करीत शिवसेनेतून आपला उमेदवारी अर्ज दाखल करताना माणचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठीच आपली उमेदवारी असल्याचे सांगितले.
यंदा प्रथमच गोरे बंधुंच्या विरोधात एकत्र आलेल्या सर्वपक्षीय विरोधकांनी उभारलेल्या “आमचं ठरलयं’च्या आघाडीतून प्रभाकर देशमुख, रणजितसिंह देशमुख व अनिल देसाई यांनी आपले वेगवेगळे पण एकत्रित अर्ज दाखल करताना अंतिम उमेदवार आमच्यापैकी कोणी एकच राहणार असल्याची ग्वाही दिली. वंचित बहुजन आघाडीतून डॉ. प्रमोद गावडे यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल करताना सर्वसामान्यांच्या न्याय व हक्कासाठी आपली उमेदवारी असल्याचे सांगितले. दरम्यान, आज शेखर गोरे व “आमचं ठरलयं’च्या उमेदवारांनी केलेले शक्तीप्रदर्शन लक्षवेधी ठरले. तर राज्यात शिवसेना व भाजपची युती असताना देखील माण- खटाव या मतदारसंघात या दोन्ही पक्षांनी आपले अधिकृत उमेदवार एकमेकांसमोर उभे केले असून याठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचे दोन्ही पक्षांकडून सांगितले तरी येथे लढत मात्र “काटा कुस्ती’ अशीच होणार असल्याची चर्चा आहे.