बीड – रविवारी सातारच्या दौऱ्यानंतर सोमवारी राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. तिथल्या शेतकऱ्यांशी संवाद साधून दुष्काळ निवारणातातल्या त्रुटींचा त्यांनी आढावा घेतला. आज त्यांनी बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील खडकट येथे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधत दौऱ्याला सुरवात केली.
यावेळी बोलताना शरद पवार म्हटले की, “यावेळची दुष्काळी परिस्थिती वेगळीच आहे. लोकांना पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. जनतेला पिण्याच्या पाण्याची कमतरता भासत आहे. या सरकारकडून 90 रू. दुष्काळी भत्ता मिळतोय, पण त्यात वाढ करण्याची अनेक स्थानिक लोकांची मागणी आहे, असं त्यांनी सांगितल.
पुढे बोलताना ते म्हटले की, “1972 च्या दुष्काळात फळबागा वाचवण्याचे काम आम्ही केले. पुढे जनतेच्या हितासाठी अन्नधान्याचा कायदा अमलात आणला. मात्र आज लोकांना या कायद्याचा लाभ होत नसून धान्याची अडचण निर्माण झाली आहे.
याच दुष्काळी दौऱ्यादरम्यान शरद पवार यांनी बीड जिल्ह्याच्या पाटोदा तालुक्यातील सौताडा येथील चारा छावणीला भेट दिली. दुधाचे दर दोन रुपयांनी कमी झाले आहेत. आधीच दुधाचे उत्पादन घटले. शेतकरी वर्गावर हे एक मोठे संकट आले आहे. विम्याचे पैसे मिळालेले नाहीत. फळबागा जळून गेल्या आहेत, त्यासाठी कोणतेही अनुदान नाही, त्या वाचवणे ही सुद्धा समस्या आहे, अशा अनेक अडचणी शेतकऱ्यांनी यावेळी बोलून दाखवल्याच्या त्यांनी यावेळी सांगितल.
राज्याचा दुष्काळी दौरा करून येत्या काही दिवसात मुख्यमंत्र्यांसोबत आम्ही त्याचा आढावा घेणार असल्याचे त्यांनी यावेळी शरद पवार यांनी सांगितले. तसेच राजकीय मतभेद बाजूला ठेवून दुष्काळग्रस्तांना दिलासा देण्याचा सर्वतोपरी प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे करण्यात येईल, असं आश्वासन देखील त्यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलं.
दरम्यान, लोकसभा निवडणूक संपताच शरद पवार यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी दौरा सुरू केला आहे. या दौऱ्यात पवार थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत.