भाजपला शह देण्यासाठी लढणार एकत्र
मुंबई : राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर आता स्थानीक निवडणूकीतही त्याचे परिणाम दिसून येवू लागले आहेत. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी हीच रणनिती आखून जिल्हा परिषदांपासूनही दूर ठेवण्याचे प्रयत्न शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीकडून करण्यात येणार असल्याचे समजते.
या तिन्ही पक्षांची ही रणनिती यशस्वी ठरल्यास भाजपला जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत मोठा फटका बसू शकतो.
राज्यातील 25 जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाराष्ट्र विकास आघाडीने एकत्र येण्याच्या हालचाली सुरु केला आहेत.
या तिन्ही पक्षांनी सहा जिल्हा परिषदेच्या निवडणुकाही एकत्र लढवण्याची तयारी केली आहे. यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी, कॉंग्रेस या तीन पक्षांची संयुक्त समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे, खासदार अनिल देसाई आणि खासदार विनायक राऊत, कॉंग्रेसतर्फे मोहन जोशी, कल्याण काळे आणि राष्ट्रवादीचे शिवाजी गर्जे यांचा समावेश आहे.
दरम्यान, 30 डिसेंबर ते 5 जानेवारी रोजी जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत भाजपला शह देण्यासाठी तिन्ही पक्ष एकत्रीत लढणार आहेत.
25 जिल्हा परिषद निवडणुका आहेत, त्यातील जास्तीत जिल्हा परिषदा जिंकण्यासाठी जोरदार प्रयत्न होणार असल्याचे निवडणूकीत चुरस निर्माण होणार आहे. सध्या 13 जिल्हा परिषदांवर शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता आहे. मात्र हे तिन्ही पक्ष एकत्र आले तर भाजपला मोठा धक्का बसू शकतो.