Viral News | भारतात लग्नाला विशेष महत्त्व आहे. प्रत्येक मुलीला आणि मुलाला लग्न करायचे असते. दोघांच्या लग्नासाठी वयही निश्चित करण्यात आले आहे. कुणाचे लग्न झाले नाही तर शेजारी तसेच नातेवाईक टोमणे मारायला लागतात. असाच काहीसा प्रकार मध्य प्रदेशातील दमोह येथे राहणाऱ्या एका तीस वर्षांच्या तरुणासोबत घडला.
दीपेंद्र राठोड असे या तीस वर्षीय तरुणाचे नाव असून त्याचे लग्न झालेले नाही. दीपेंद्र राठोड ई-रिक्षा चालवतात. लग्न न झाल्याने त्यांनी अनोखी पद्धत अवलंबली. दीपेंद्रने त्याच्या ई-रिक्षात एक मोठे होर्डिंग लावले आहे, ज्यामध्ये त्याने त्याची संपूर्ण माहिती दिली आहे. या होर्डिंगमध्ये त्यांनी शिक्षण, उंची, रक्तगट इत्यादी लिहिले आहे. तो ई-रिक्षातून शहरात फिरत असतो. जिथे तो ई-रिक्षा घेऊन जातो, तिथे लोक होर्डिंगवर काय लिहिले आहे ते वाचू लागतात. यामुळे तो शहरात चर्चेचा विषय ठरला आहे.
तो म्हणतो की, “माझे वय 30 वर्षं झाले आहे, परंतु अजूनगी लग्नासाठी कोणतेही स्थळ येत नाही. मला लग्न करायचे आहे. त्यामुळे मला तसे करणे भाग पडले आहे.
होर्डिंगवर त्याने एक खास गोष्ट लिहिली आहे. त्याने लिहिले आहे की, लग्नासाठी जात-धर्माचे कोणतेही बंधन नाही. कोणत्याही जाती-धर्माची मुलगी किंवा तिचे कुटुंबीय त्याच्याकडे लग्नाचा प्रस्ताव घेऊन येऊ शकतात.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, दीपेंद्र सांगतात की, त्याच्या कुटुंबीयांनी त्याच्या लग्नाबद्दल अनेकदा अनेकांजवळ बोलणी केली, पण प्रत्येक वेळी कोणत्या ना कोणत्या कारणाने त्यांचे नाते तुटले. लग्न न केल्याने लोक त्याला टोमणे मारू लागले. यामुळे त्यांनी हा अनोखा मार्ग स्वीकारला आणि रिक्षाच्या मागे लग्नासाठीचा बायोडेटा पोस्ट केला. आता दीपेंद्रकडे लग्नासाठी अनेक मुलींची स्थळं येत असल्याचं सांगितलं जात आहे.