हैदराबाद: इस्त्रो म्हणजेच भारतीय अंतरीक्ष संशोधन संस्थेने अंतरीक्षात स्थानक उभारण्याचा इरादा व्यक्त केला आहे. त्यांच्या या घोषणेचे प्रख्यात अंतरीक्ष संशोधक जी माधवन नायर यांनी स्वागत केले आहे. हा अत्यंत उत्साहवर्धक प्रकल्प असून त्यामुळे भारताला अंतरीक्ष संशोधन कार्यात जगाचे नेतृत्व करता येईल असे त्यांनी म्हटले आहे. या घोषणेमुळे आपण अत्यंत एक्साईट झालो आहोत अशी प्रतिक्रीया त्यांनी नोंदवली आहे.
इस्त्रोच्या प्रस्तावित गगनयान मिशनच्या बाबतीत बोलताना ते म्हणाले की या आधारे भारताला सन 2022 पर्यंत अंतराळात मनुष्य पाठवण्याचे उद्दीष्ठ साध्य करता येणार आहे. अंतरीक्षात स्पेस स्टेशन उभारणी करणे ही गगनयान प्रकल्पाचीच पुढची पायरी ठरेल असेही त्यांनी म्हटले आहे. असे प्रकल्प मोठ्या कालावधीचे असतात त्याची आखणी आणि आराखडा तयार करणे आणि त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणे हे त्याचे महत्वाचे टप्पे आहेत. सरकारने या प्रकल्पाला मंजुरी दिली असेल तर तो एक अत्यंत उत्साहवर्धक निर्णय असेल असेही त्यांनी म्हटले आहे.
इस्त्रोचे विद्यमान अध्यक्ष के सिवन यांनी गेल्या गुरूवारी ही स्पेस स्टेशन उभारणीची घोषणा केली होती. या स्पेस स्टेशनचे वजन सुमारे 20 टन इतके असेल. या अंतरीक्ष केंद्रात अंतराळवीरांना तेथे राहणे शक्य होणार आहे तसेच तेथे अंतरीक्ष यानही उभारता येणार आहे. सध्या पृथ्वीच्या अगदी जवळच्या अंतरीक्ष कक्षेत एक आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन कार्यरत आहे. तेथे अंतराळ संशोधकांना काही प्रयोग करणे त्यामुळे शक्य झाले आहे. अमेरिका आणि अन्य युरोपियन देशांच्या संयुक्त प्रयत्नांनी तेथे हे अंतराळ स्थानक उभारण्यात आले आहे. 120 अब्ज अमेरिकन डॉलर्स खर्चून हे अंतरीक्ष स्थानक उभारण्यात आले असून त्याच्या देखभालीसाठी दरवर्षी 6 ते 7 लाख इतका खर्च येतो आहे.