पिंपरी, दि. 4 – महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मागण्यांसाठी संपाचे हत्यार उपासले आहे. त्यांच्या संपामुळे पिंपरी-चिंचवडमधील औद्योगिक पट्ट्यात अनेक ठिकाणी चार तास वीज पुरवठा खंडित झाला होता. परिणामी सुमारे दीड हजार कंपन्यांना आपल्या कंपन्या बंद ठेवण्याची वेळ आली असल्याने उद्योजक संताप व्यक्त करत आहेत.
खासगीकरणाविरोधात महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारत आपला निषेध व्यक्त केला आहे. कर्मचारी कामावर नसल्याने अनेक ठिकाणी झालेले तांत्रिक बिघाड दुरूस्त करण्याकडे महावितरणला अपयश आले. त्यामुळे वीजपुरवठा खंडित होण्याची वेळ आली. पिंपरी-चिंचवडमधील औद्योगिक परिसरातील सेक्टर 7, टी ब्लॉक मध्ये सकाळी सव्वा आठ वाजता वीज पुरवठा खंडित झाला होता. किरकोळ तांत्रिक बिघाड झाल्याने ही समस्या निर्माण झाली होती. त्याच्या दुरूस्तीसाठी पर्यायी सोय नसल्याने चार तास वीज पुरवठा खंडित होता. विद्युत पुरवठा खंडित झाल्याने सुमारे दीड हजार कंपन्यांचे उत्पादन थांबले होते.
उद्योजकांच्या पाठपुराव्यानंतर चार तासानंतर दुपारी सव्वा बारा वाजता वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला. तो पर्यंत लघुउद्योजकांना लाखो रुपयांचा तोटा सहन करावा लागला. आधीच खंडित वीज पुरवठ्याने लघुउद्योजक हैराण आहेत. त्यामध्ये आणखीन समस्येत भर पडत असल्याने उद्योजक मेटाकुटीला आले आहेत.
महावितरणचे कर्मचारी संपावर जाणार आहेत हे माहीत असून देखील पर्यायी व्यवस्था केली नाही. पर्यायी सोय केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र तसे काहीच दिसले नाही. अधिकारी देखील संपकऱ्यांच्या पाठीशी आहेत, का अशी शंका येते. सेक्टर 7 आणि टी ब्लॉकमधील दीड हजार कंपन्या बंद ठेवण्याची वेळ उद्योजकांवर आली.
– संदीप बेलसरे, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड लघुउद्योजक संघटना