आयुष्य जगताना आपण सुटसुटीत जगण्यापेक्षा गुंतागुंतच जास्त करून घेतो बऱ्याचदा. प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतातच की, तसंच आहे आयुष्याचेही. आपण कसं जगायचं ते आपणच ठरवलं पाहिजे नाही का? त्यात आम्ही स्त्रिया जरा जास्तच भावनिक होतो, आयुष्याच्या बाबतीत आणि मग गळ्यापर्यंत अपेक्षांच्या ओझ्यात बुडून जगत राहतो. मारतोही एखादी उसळी, मोकळा श्वास घ्यायची इच्छा होते तेव्हा. पण तेही तेवढ्यापुरतंच. पुन्हा आहेच ती अपेक्षांची दलदल. आजवर खूपजणांनी लिहिलंय या विषयावर पण मग मी काय वेगळं मांडणार असाही प्रश्न येतोच. मला मांडायचाय विषय स्त्रीमध्ये लपलेल्या तिच्याच प्रतिबिंबाचा…
स्वतःला स्वतः समोर उभे करून जेव्हा कधी पाहिलं जाईल तेव्हा खरा अर्थ समजेल. अख्खं आयुष्य संपत स्वतःच्या शोधात आणि केवळ अंग समजावून घ्यायची कुवत नसते म्हणून अथवा लायकी नसते म्हणून आपण लपवत राहतो स्वतःलाच वेगवेगळ्या पोषाखांत. परिस्थिती, नातं, अगतिकता इत्यादी गोंडस नावांखाली. त्या सत्याला सामोरेच जात नाही आपण, जे आपल्यावर साठलेली विकारांची धूळ बाजूला करायला उत्सुक असते… हे स्त्री अंग या शब्दांच्या अर्थांच्या चौकटीतून बाहेर निघायला हवे.
स्वतःची फसवणूक थांबवायला हवी. स्वत्वाचा शोध घेताना. डोळ्यातल्या एका थेंबात लपलेल्या हजारो लाखो वेदना या ज्याने सहन केलेल्या असतात त्यालाच त्या कळतात. स्वतःला सर्वांमधून निरीच्छ केलेल्या लोकांनाही हे वेदनेचे भोग भोगावे लागतात. स्वतःला आतून पिळवटून काढावं लागतं. तेव्हा आयुष्य सोबतीला तयार होतं.
गाण्याची लकेर पोटातून येण्यापेक्षा हृदयातून आली तर ती जास्त वेदनादायी वाटते. पोटातून येणाऱ्या गाण्याची तीव्रता… भूक भागली की कमी होते, तसं हृदयाचं नसतं. म्हणूनच स्वतःमधील प्रतिबिंब शोधताना ठरवलं स्वतःची बकेटलिस्ट मांडून पाहूया कधीतरी. मग आणि मगच कळेल आजवर जगलो ते किती टक्के खरं जगलो. नकारात्मकतेतून बाहेर येण्यासाठी स्वतःवर प्रेम करावे.
मानसी चिटणीस