मोहन आणि स्मिता या दोघा नवरा-बायकोत संवाद चालला होता. स्मिताने गाडीचा विमा उतरविण्यासाठी मोहनकडे तगादा लावला होता. कारण गाडीच्या विम्याची मुदत कालच संपून गेली होती. पैसे असूनही केवळ व्यस्ततेचे कारण देत मोहन चालढकलपणा करीत होता. स्मिता ऐकायला तयार नव्हती. अखेर मोहन चिडून तिला बोलला, “आजऐवजी उद्या केले तर बिघडते कुठे? उद्या काय भूकंप येणार आहे का?’ स्मिता मात्र पुरती वैतागली होती. पण काय करणार मोहनच्या स्वभावापुढे तिचा निभाव लागत नव्हता. दिवस सरला रात्र झाली. दोघेही नवरा-बायको जेवण करून झोपी गेले.
मध्यरात्री आरडाओरड झाल्याचा आवाज त्यांच्या कानावर पडला. दोघेही घराबाहेर आले. पाहतात तर काय, पार्किंगमध्ये शॉर्टसर्किटमुळे मोठी आग लागली होती आणि त्या आगीत त्यांची गाडी जळून खाक होत होती. मोठ्या कष्टाने घेतलेली गाडी आज कोळसा होत होती. विमा समाप्त झाला असल्याने कंपनीने भरपाई दिली नाही. कदाचित आज मोहनने वेळेत विमा काढला असता तर त्याच्यावर ही वेळ आली नसती. आजचे काम उद्यावर ढकलल्यामुळे आर्थिक आणि मानसिक फटका त्याला बसला होता.
आजचे काम उद्यावर ढकलण्यातून माणसातील बेफिकिरी दिसून येत असते आणि अशा बेफिकीर आळशी वृत्तीचा आपल्याला फटका बसत असतो. अनेकदा आलेल्या संधी उद्यावर गेल्यामुळे पुन्हा कधीही त्या नजरेस येत नाही. माणसाने आजचा दिवस, आजचा क्षण महत्त्वाचा मानून संधीचे सोने केले पाहिजे अन्यथा पश्चातापाशिवाय हाती काहीही लागत नाही.
याबाबत एक काल्पनिक कथा आपल्याला नक्कीच बोध देऊन जाईल. एकदा एका दुःखी माणसावर देव प्रसन्न झाला आणि त्याला त्याच्या दुःखाचे कारण विचारले. त्याने आपली गरिबी हीच आपल्या दुःखाचे कारण असल्याचे सांगितले. देवाने त्याला एक जादुई काठी दिली. देव त्याला म्हणाला, “ही जादुई काठी मी तुला दोन दिवसांसाठी देत आहे, दोन दिवसांनंतर ही काठी आपोआप गायब होईल. या काठीचा तू ज्या दगडाला स्पर्श करशील त्याचे सोने होईल. परंतु लक्षात ठेव ही काठी फक्त सायंकाळच्या सूर्यास्ताच्या लाल सूर्यप्रकाशातच काम करते.’
तो माणूस ही संधी मिळाल्यामुळे खूप खूश झाला, परंतु आळशी आणि चालढकलपणा हे त्याच्या स्वभावाचे दुर्गुण होते. ती जादुई काठी मिळाल्याच्या आनंदात त्याने पहिल्या दिवशी पोटभर जेवण करून दुपारी आल्हाददायक झोप घेतली. सुखवस्तू आणि श्रीमंत जीवनाची स्वप्ने पाहण्यातच रात्र झाली आणि तो खडबडून जागा झाला. तो दिवस, ती संधी निघून गेली होती. मात्र, त्याला त्याची तमा नव्हती. अजून एक दिवस आहे ना या भरवशावर तो निर्धास्त होता.
दुसऱ्या दिवशी तो सकाळी उठल्यावर त्याच्या पूर्ण लक्षात होते की सोनं मिळवायचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्याने मनाशी पक्के ठरवले की देवाने दिलेल्या जादुई काठीचा आज पुरेपूर फायदा उठवायचा. त्याने ठरवलं की तो डोंगरावर जाईल. मोठमोठ्या काळ्या दगडांना काठीचा स्पर्श करून त्याचे सोने करेल आणि घोडागाडीत सारे सोने घरी घेऊन येईल.
दिवस पुढे सरत चालला होता, परंतु तो अजून ह्याच विचारात होता की अजून खूप वेळ आहे. त्याने ठरवलं की दुपारचं जेवण झालं की डोंगरावर जायचं. परंतु जेवल्यानंतर त्याला विश्राम करण्याची सवय होती. त्याने डोंगरावर जाण्याऐवजी थोडा आराम करण्याचा विचार केला. आज मात्र तो वेळेआधी उठला आणि डोंगरावर जाण्याची तयारी करू लागला. तो घराबाहेर पडला मात्र त्याला धक्काच बसला. कारण ढगांची जमवाजमव झाली होती. मावळत्या सूर्याला गडगडणाऱ्या ढगांनी व्यापले होते. काही वेळातच धो धो पावसाला सुरुवात झाली. सूर्यास्ताचे सूर्यकिरण मात्र अद्यापही दिसले नाहीत. सूर्यास्ताचा सूर्यप्रकाश नसल्याने त्या जादुई काठीचा काहीही उपयोग झाला नाही. रात्र होताच ती जादुई काठी गायब झाली. आजचे काम उद्यावर ढकलण्याच्या सवयीमुळे पश्चातापाच्या काठीचा फटका त्याच्या मनावर चांगलाच बसला होता.
आता यातून बोध घ्यायचा झाल्यास आपल्याला हे नक्कीच उमजेल की आजची गोष्ट उद्यावर नेण्यात काहीही अर्थ नाही. कारण मिळालेल्या संधीलाही मर्यादा असतात. ज्याप्रमाणे पहिल्या दिवशी त्याचा स्वभाव त्या संधीची मर्यादा ठरला. तर दुसऱ्या दिवशी परिस्थितीने/नियतीने त्याच्याकडून संधी हिसकावून घेतली. त्यामुळे दगडाचे आणि संधीचे सोने त्या माणसाला करता आले नाही. उद्याच्या आशेच्या सूर्योदयासाठी आजची सूर्यास्ताची मेहनत महत्त्वाची ठरत असते. म्हणूनच आता “कशाला उद्याची बात’ म्हणत आजचा दिवस सार्थकी लावायला हवा. आजचा दिवस माझा समजून त्या दिवसाचे सोने करता आले पाहिजे. नाहीतर पश्चातापाची जादुई काठी एक दिवस आपले कंबरडे मोडल्याशिवाय राहणार नाही. नेहमी प्रयत्नशील राहा. आजचा दिवस अंतिम वैधता म्हणून काम करा. जीवनातील ध्येये सहज सिद्धीस जातील.
सागर ननावरे