14 फेब्रुवारी हा दिवस दरवर्षी संत व्हॅलेन्टाइन यांचा जन्मदिन म्हणून व्हॅलेन्टाइन डे म्हणजे प्रेमाचा दिवस म्हणून साजरा केला जातो.
त्या निमित्त…
प्रेम ही मानवी जीवनातील एक सर्वव्यापी प्रेरकशक्ती असून, स्त्री -पुरुषातील स्वाभाविक आकर्षणातून उद्भवणारी प्रेमभावना नैसर्गिक व चिरंतन असल्याने तिच्या सर्वसामान्यतेतून मराठी साहित्यात आद्यकवी केशवसुत यांच्या काळापासून प्रेमकवितांचा प्रवाह मुक्तपणे वाहू लागला. पण त्यांच्या पूर्वीच्या काळातही संत कवी, पंडित, शाहीर कवींनी आपल्या काळाला अनुसरून प्रेम कवितांची निर्मिती केली होती. राधा-कृष्णाचं निखळ-निरलस प्रेम, बहीण-भावचं प्रेम, आई-मुलाचं प्रेम, प्रियकर-प्रेयसीचं प्रेम, पती-पत्नीचं प्रेम, नातवावर असलेलं आजी-आजोबांचं प्रेम, असे प्रेमाचे विविध आविष्कार असून, मराठी साहित्यात प्रेम हा शब्द तितकाच महत्वाचा आहे. प्रेमाला स्पर्श करणाऱ्या हळुवार भावना आजपर्यंत सर्व सिद्धहस्त मराठी लेखक-कवींनी आपल्या लीलया लेखणीतून साकारल्या आहेत.आधुनिक मराठी काव्याचे जनक म्हणून सर्वश्रुत असलेले कै. कृष्णाजी केशव दामले म्हणजे कवी केशवसुत हे जरी तत्कालीन समाजात बंडखोर कवी म्हणून परिचित असले तरी त्यांनीही प्रेमाविषयी कविता साकारली आहे. ते “प्रीती’ या कवितेत लिहितात…
प्रीती मिळेल का हो बाजारी?
प्रीती मिळेल का हो शेजारी?
प्रीती मिळेल का हो बागांत?
प्रीती मिळेल का हो शेतात?
प्रीतीची नसे अशी गंमत पहा शोधूनी हृदयात!
खरंच, प्रेम हे हृदयातच असावं लागतं असा संदेश ते देतात. याच काव्यपरंपरेतील एक कवयित्री, खानदेश कन्या बहिणाबाई चौधरी! मुळात निरक्षर पण जनसामान्यज्ञानाची खरी पारख असलेली कवयित्री आपल्या कवितेतून परस्परातील प्रेमाचा संदेश देतात. कोणताही माणूस हा परिपूर्ण नसून, त्याच्या दुर्गुणाकडे दुर्लक्ष करून, त्याच्या गुणांची कदर करावी, परस्परातील प्रेम जोपासावे असा त्यांचा मानवी जीवनाबद्दल दृष्टिकोन होता.त्या म्हणतात…
सोता झाला रे आरसा, असा मनाचा जो साफ
तठे कशाचं रे पाप, त्याले सात गुन्हे माफ
तर त्या गुढीपाडवा या कवितेतून संदेश देतात…
गुढीपाडव्याचा सन, आता उभारा रे गुढी
नव्या वरसाच देन, सोडा मनातली आढी
याच काळातील एक कवी म्हणजे रेव्हरंड नारायण वामन टिळक! त्यांच्या शुद्ध प्रेम आणि वियोग या कवितेत लिहितात.
उत्साहाचा कर धरुनिया शुद्ध अव्याज चित्ते
जेथे प्रीती अविरत अहा चालवी तांडवाते…
मराठीचे शेक्सपिअर म्हणून परिचित असलेले कै. राम गणेश गडकरी म्हणजे कवी गोविंदाग्रज यांची अल्लड प्रेमास, गुलाबी कोडे, मुरली, प्रेम आणि मरण अशा कविता जणू खऱ्या प्रेमाची ग्वाही देतात. अल्लड प्रेमास या कवितेत ते लिहितात,
क्षणभर वेड्या प्रेम थांब
अधीर मनासह जाशी कोठे
चुकशील-संकटी पडशील वाटे
जग हे सारे बा रे खोटे!
हृदया सोडून गड्या म्हणोनी, जाई न कोठे लांब!
या काव्यातून जणू प्रेमाविषयीची अल्लड भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
तर गुलाबी कोडे या कवितेत ते लिहितात,
रंग इकडचा तिकडे वठला
छटा कुठूनी केली?
ही जादूची नजरबंदी कुणी
कधी कशी केली?
तर शेवटचे प्रेमगीत या कवितेत ते लिहितात…
एक आशा उरे
तिजसवे जीव करी एकमयता
जन्मजन्मांतरी एकदा क्षणभरी
प्रेम लाभो तुझे शोकघाता
वास्तविक ही कविता काल्पनिक नसून गोविंदाग्रज यांच्या जीवनावर असावी असे म्हणणे उचित ठरेल, कारण जेव्हा त्यांच्या प्रथम पत्नी सीताबाई गडकरी त्यांना सोडून कायमच्या माहेरी गेल्या तेव्हा ही कविता त्यांनी लिहिली. या कवितांप्रमाणे त्यांच्या प्रेमाखातर, पुनर्जात प्रेमास, प्रेमाचा प्रलयकाळ, प्रेमशोधन, प्रेमकाळ या कविता जरी जुन्या काळातील वाटत असल्या तरी, अभ्यासाच्या दृष्टीने त्या महत्त्वाच्या आहेत. मराठी काव्यातील आणखी एक सुप्रसिद्ध कवी म्हणजे कै. नारायण मुरलीधर गुप्ते ऊर्फ कवी बी! जरी ते नावाने कवी बी असले, तरी त्यांच्या कविता या ए वन दर्जाच्या आहेत असे सुप्रसिद्ध साहित्यिक व पत्रकार कै. आचार्य अत्रे यांनी म्हटले आहे. त्यांची “माझी कन्या’ ही कविता म्हणजे वडिलांचे असलेले मुलीवरील प्रेम यांचा जणू उत्तम नमुना आहे. तसे पाहिले तर आईला जसा मुलगा प्रिय असतो, तशी वडिलांना मुलगी! त्या कवितेत ते लिहितात…
गायी पाण्यावर काय म्हणुनी आल्या?
का गं गंगा यमुनाही त्या मिळाल्या?
उभय पितरांच्या चित्त चोरटीला
कोण माझ्या बोलले गोरटीला?
ही कविता काल्पनिक नसून, कवी बी यांची कन्या कु. कमळा नारायण गुप्ते हिच्या बाबतीत घडलेल्या प्रसंगावर आधारित आहे. एकदा कमळा तिच्या मैत्रिणीसह खेळायला जाते. कमळा ही मधमवर्गीय कुटुंबातील असून, तिच्या मैत्रिणी या तत्कालीन उच्चभ्रू समाजातील असतात व तिला त्या कमी लेखून चिडवतात. साहजिकच कमळाला वाईट वाटते व रडत रडत घरी येऊन ती सर्व हकीकत आपल्या वडिलांना सांगते. त्यावर तिची समजूत कवितेतून घालताना ते तिला म्हणतात…
तुला घेईन पोलके मखमलीचे
कुडी मोत्यांची फुल सुवर्णाचे
हौस बाई! पुरविन तुझी सारी
परी आवरी हा प्रलय महाभारी
मोठेपणी कमळाला या कवितेमागील खरी हकीकत कळली, तेव्हा तिला अश्रू आवरणे मोठे कठीण झाले. तसेच त्यांची “चाफा’ ही कविता म्हणजे शुद्ध प्रेमाचे नितांतसुंदर सुक्तच आहे असे म्हणावयास हरकत नाही. या कवितेचे पुढे सुंदर अशा गीतात रूपांतर झाले. संगीतकार कै. वसंत प्रभू यांचा स्वरसाज व गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा मोहक स्वर म्हणजे जणू कपिलाषष्टीचा योगच! कवी बींच्या स्त्रीप्रेमविषयक कल्पनांचे, उदात्त, विशुद्ध आणि ओजस्वी स्वरूप या गीतात प्रकट झाले आहे.निसर्गसिद्ध शुद्ध प्रेमभावनेने निघालेले नि:शंक आतुर उद्गार “चाफा’ या कवितेत कवी बी यांनी त्यांच्या लीलया
लेखणीतून साकारले आहे. त्याचप्रमाणे त्यांची “वात्सल्य’ ही कविता महत्त्वाची आहे.
चाफा बोलेना चाफा चालेना
चाफा खंत करी काही केल्या बोलेना…
त्या नंतरच्या काळात मराठी प्रेमकविता हळूहळू बहरास आली. मराठी नवकवितेचे जनक म्हणून कवी बा. सी. मर्ढेकर सर्वश्रुत आहेत. त्यांच्या सर्वच कविता त्या काळात व आजही तितक्याच महत्त्वाच्या आहेत. त्यांची “प्रेमाचे लव्हाळे’ ही कविता प्रसिद्ध आहे. त्या कवितेत ते लिहितात…
प्रेमाचे लव्हाळे
सौंदर्य नव्हाळे
शोधू? आसपास
याच काळातील कोकणातील एक कवी म्हणजे कै. वि. ल. बर्वे उर्फ कवी आनंद यांच्या सारख्या पुरोगामी विचारांचे सुधारक कवी! कोकणातील चिपळूण येथे त्यांचा जन्म व मृत्यू यामुळे ते खऱ्या अर्थाने कोकणचे सुपुत्रच होते. एखाद्या व्यक्तीला आपल्या गावाबद्दलचे प्रेम असते याचा प्रत्यय त्यांच्या कवितेत येतो. माल मुलखात राहून कंटाळलेल्या कोकणी माणसाला कोकणकडे जाताना कशी हुरहूर लागेल याचे सोप्या, साध्या, सुंदर शब्दात वर्णन त्यांनी केले आहे.
लांब लांबच्या माळावरून!
जाती भूर भूर पंख हलवूनी!
एकसारखे खेळे नयनी!
हर्ष भाराचे रडे
निघाली कोकणघरट्याकडे!
त्याच कोकणचे आणखी एक सुपुत्र म्हणजे कवी माधव केशव काटदरे ऊर्फ कवी माधव.त्यांनी आपल्या तारुण्यसुलभ प्रेमभावनेचा आविष्कार आपल्या तरुण वयात लिहिलेल्या काव्यातून साकारला आहे. तसेच त्यांनी आपल्या प्रेमकाव्यातून प्रीतीची अनेकविध रूपे चित्रित केली आहेत. त्यांच्या काही कविता या व्यक्तिगत अनुभवांबरोबर काल्पनिकतेवर आधारलेल्या प्रेम कविताही लिहिल्या आहेत. प्रथम दर्शन या काव्यातून ते प्रेयसीच्या पहिल्यावहिल्या दर्शनाचा कवीमनावरील प्रभाव सांगताना म्हणतात…
हास्य लास्य करी नाजूक गाली
बुद्धिमत्वही विशाल कपाली!
कवी माधवांच्या प्रेमकविता या वृत्तबद्ध असून, प्रीतीच्या राज्यात स्त्री आणि पुरुष समान आहेत असा विचार त्यांनी आपल्या काव्यातून मांडला. प्रियकरासाठी जीवाचे रान करणारी, त्याला सर्वस्व समर्पण करणारी प्रिया जशी ते काव्यातून उभी करतात, तसाच प्रेयसीच्या बुद्धिमत्तेचा, रसिकतेचा, आदर करणारा, तिच्या रूप-गुण-सौंदर्य या गुणावरून जीव ओवाळून टाकणारा प्रियकरही ते रंगवतात. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या बंगाली प्रेमकवितांचा कवी माधवांनी केलेला मराठी अनुवाद हा मराठी अनुवादाचा उत्तम नमुना आहे. कारण मराठी साहित्यात एकूण पाहता, कथा, कादंबरी, चरित्र, आत्मचरित्र व इतर लेख यांचे अनुवाद झाले आहेत, पण काव्याचे काही मोजकेच म्हणावे लागतील. आपण जर आईविषयक कवितांचा अभ्यास केला, तर आईचे बाळाविषयी असलेले प्रेम एक मातृप्रेमाची ग्वाही देते. मराठी काव्यातील एक सुप्रसिद्ध कवी म्हणजे कै. दत्तप्रसन्न कारखानीस! त्यांच्या सर्वच कविता या तत्कालीन समाजजीवनाचा एक भाग आहे असे म्हणणे उचित ठरेल. त्यांची खऱ्या प्रेमाची ग्वाही देणारी कविता म्हणजे रमू ये प्रेम संसारी! या कवितेत ते लिहितात…
करी निर्धार शेवटचा, विचारी वृत्ती तव भारी
कितीदा सांगणे तुजला, रमू ये प्रेम संसारी
ही कविता वाचताना माणसाच्या संसारातील खऱ्या प्रेमाची अनुभूती येतेच. सुप्रसिद्ध साहित्यिक, पत्रकार, कवी आचार्य अत्रे उर्फ कवी केशवकुमार यांचा “झेंडूची फुले’ हा काव्यसंग्रह म्हणजे विडंबन कवितांचा एक उत्तम नमुना ! यातील “प्रेमाचा गुलकंद’ या कवितेत ते लिहितात.
तोंड आंबले असेल ज्यांचे प्रेमनिराशेने
प्रेमाचा गुलकंद तयांनी चाटून हा बघणे
मराठीतील एक ज्येष्ठ कवी म्हणजे कविवर्य मंगेश पाडगावकर! त्यांच्या सर्व विषयांना अनुसरून असलेल्या कविता आजही सर्व अबाल-वृद्धांना आनंद देतात.
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत
तुमच आमच अगदी सेम असत.
अशी प्रेमाविषयीची सहज, सोपी, भावना त्यांच्या काव्यातून व्यक्त होते. तर एखाद्याने कोणावर जरी मनापासून प्रेम करणे हा गुन्हा नव्हे अशी ते प्रेमाची व्याख्या काव्यातून सांगताना म्हणतात…
त्याने प्रेम केल किवा तिने प्रेम केल
करू दे कि, मला सांगा तुमच काय गेल…
अशा प्रेमाचे विविधरंगी आविष्कार मराठी काव्यातून अनेक कवी-कवियत्रींनी निर्माण केल्याने आपण आज खऱ्या अर्थाने मराठी प्रेमकाव्यात पडलो तर, आजच्या दिवशी खऱ्या अर्थाने प्रेमोत्सव साजरा होईल, यात शंका नाही.
अमेय गुप्ते