आंबेगाव तालुक्यातील 40 गावातील शेतकऱ्यांना फटका
मंचर – श्रीक्षेत्र भीमाशंकर परिसरात झालेल्या संततधार पावसाने भातपिके सडली आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त भातपिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
पश्चिम आदिवासी भागातील कोंढवळ, गवांदेवाडी, निगडाळे, राजपूर, तळेघर, असाणे, आहुपे आदी चाळीस गावांत झालेल्या पावसाने अनेक भागांतील भाताची रोपे सडली (कुजली) आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. काही भागात शेतकऱ्यांची भातरोपे वाहून गेली आहेत तर काही ठिकाणी रोपे पाण्यात बुडून असल्याने कुजली आहेत. शेतीचे बांध पावसाच्या पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेले आहेत तर काहींच्या शेतात पाण्याच्या प्रवाहाबरोबर माती आल्याने भातपिके गाडली गेली आहेत. याचाच परिणाम आदिवासी शेतकरी कुटुंबांच्या अर्थकारणावर होणार आहे.
शेतीसाठी घेतलेले कर्ज कसे फेडावे व परिवाराचे पालनपोषण कसे करावे या चिंतेने शेतकरी हतबल झाले आहेत. नुकसानग्रस्त भातपिकांचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी वामन लोहकरे, हिरामण गायकवाड, शांताराम कारोटे, एकनाथ गेंगजे, गेणू लोहकरे, सुभाष मदगे, तुकाराम कुऱ्हाडे, चिंधू लोहकरे, मारुती लोहकरे, पंगाजी लोहकरे यांनी केली आहे.
- सततच्या पावसाने माझ्या शेतातील भातपीक कुजले आहेत. पावसाच्या लहरीपणामुळे दिवसेंदिवस भातशेती करणे अवघड होत चालले आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास भातशेतीचे क्षेत्र व उत्पन्न कमी होण्याची चिन्हे आहेत.
हिरामण गायकवाड, भात उत्पादक शेतकरी, निगडाळे - अति पावसाने लागवड केलेल्या भात रोपांचे मोठे नुकसान झाले आहे. भात रोपे कुजली आहेत. शेतीचे बांध पावसाच्या पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेले आहेत. शासनाने पंचनामे करुन शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी.
एकनाथ गेंगजे, शेतकरी