पिंपरी – करोनाचा प्रसार रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी प्रत्येकाने मास्क लावणे सरकारने अनिवार्य केले आहे. महापालिका आणि पोलीस प्रशासन यांनीही मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. यामुळे गेल्या काही दिवसांत दर्जेदार मास्कला मागणी वाढली आहे. मास्कच्या किंमती सरकारने नियंत्रित केल्या असल्या तरी अनेक दुकानांत मास्कची जादा दराने विक्री होत आहे. यातून सर्वसामान्य नागरिकांची लूट होत आहे. यामुळे तक्रार करावी तर कोणाकडे, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
सरकारने दर निश्चित केले असले तरी खासगी रुग्णालयाकडून जादा बिल आकारून रुग्णांची पिळवणूक सुरू आहे. रुग्णालयानंतर सरकारने दर्जेदार मास्कचेही दर नियंत्रणात आले. एन-95 हा मास्क 19 ते 49 रुपये, तर दुपदरी आणि तीनपदरी मास्कचा तीन ते चार रुपये दर निर्धारित केला आहेत.
याप्रकरणी तक्रार उद्भवल्यास राज्य स्तरावर आयुक्त, अन्न व औषध प्रशासन व जिल्हा स्तरावर, जिल्हाधिकारी हे तक्रार निवारणासाठी सक्षम प्राधिकारी असतील असे जाहीर केले. मात्र ही सर्व कार्यालये पुण्यात असल्याने केवळ तक्रार करण्यासाठी पुण्यात जाणे नागरिक टाळत आहेत.
प्रत्यक्षात बाजारात साधा होममेड मास्क 30 रुपयांना विकला जातोय, तर दोन पदरी, तीन पदरी मास्क 60 ते 70 रुपयांना आणि एन-95, मास्क शंभर रुपयांच्या पुढे एमआरपीच्या किंमतीत विकला जातो. यामुळे होममेड मास्कला मोठी मागणी आहे. मात्र होममेड मास्कच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे.