कामशेत – दोन-तीन दिवसांपासून मावळ तालुक्यात सुरू असलेल्या पावसामुळे इंद्रायणी नदीची पाणी पातळी वाढल्याने रविवारी दुपारी कामशेत येथील वडीवळे पूल पाण्याखाली गेला आहे. पूल पाण्याखाली गेल्याने पुलापलीकडे असणाऱ्या आठ गावांचा संपर्क तुटला आहे
दुपारी एक वाजल्यापासून पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागल्याने या पुलावरील वाहतूक ठप्प झाली आहे. आठ गावांना कामशेतला जोडणारा हा मुख्य पूल असल्याने सकाळी कामानिमित्त गावांमधून बाहेर पडलेल्या लोकांना पुलावरून पाणी गेल्याने पुन्हा घरी जाणे अशक्य झाले आहे. त्यामुळे नदीचा प्रवाह कमी होण्याची वाट पाहत दोन्ही बाजूला नागरिक ताटकळत उभे होते. रात्री उशीरा पुलावरील पाण्याचा प्रवाह कमी झाल्याने वाहतूक सुरळीत झाली.
कामशेत जवळील वडिवळे गावातील इंद्रायणी नदीवरील हा पूल जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत येत असून दरवर्षी तीन ते चार वेळा पाण्याखाली जातो.