रायपूर – कॉंग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष राहूल गांधी यांना अंमली पदार्थाचे व्यसन असल्याचे केलेले वक्तव्य, भाजपाचे राज्यसभा सदस्य सुब्रमण्यम स्वामी यांना भोवले असून त्यांच्याविरोधात छत्तिसगडमधील जशपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. छत्तिसगडमधील जशपूर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष पवन अगरवाल यांनी याप्रकरणी पाथलगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
त्यावरुन पोलिसांनी ही कारवाई केली आहे. याप्रकरणी भारतीय दंडविधान संहितेचे कलम 509 (चिथावणीखोर वक्तव्ये करुन सामाजिक शांततेला बाधा पोहोचवणे), कलम 505 (2) (व्यक्तीचा अथवा समूहाचा अवमान करणे) आणि कलम 511 (जन्मठेपेइतकी गंभीर शिक्षा होण्याइतपत कृत्य करणे) यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात पवन अगरवाल यांनी म्हटले आहे की, स्वत: स्वामी यांना कल्पना आहे की, त्यांनी राहूल गांधींवर केलेले आरोप निराधार आहेत. त्यांची विधाने निषेधार्ह आहेत. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान कॉंग्रेसच्या अध्यक्षांचे चारित्र्यहनन करण्याच्या उद्देशानेच त्यांनी ही विधाने करुन वाद ओढवून घेतला आहे.