लोणावळा – शहरात महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षाचे स्थानिक कार्यकर्ते आणि भाजपची शहर महिला आघाडीच्या कार्यकर्त्या आमनेसामने आल्या. यावेळी कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे लोणावळा शहरात काही काळ राजकीय तणाव निर्माण झाल्याचे बघायला मिळाले. निमित्त होते शहरात आलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेचे.
केंद्र सरकारच्या योजना आणि योजनांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोचविण्यासाठी शासनाकडून देशभरात विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. लोणावळा शहरात शुक्रवारी या यात्रेचे आगमन झाले. सकाळच्या सत्रात पुरंदरे ग्राउंड येथे या यात्रेचा पहिला टप्पा उरकल्यानंतर सायंकाळच्या सत्रात रेल्वे इन्स्टिट्यूट याठिकाणी यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात होत असतानाच महाविकास आघाडीमधील काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांचे काही स्थानिय नेते आणि कार्यकर्त्यांनी यात्रा ठिकाणी जाऊन मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. हे समजताच त्याठिकाणी हजर झालेल्या लोणावळ्याच्या माजी नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्यां विरोधी गटाच्या पुढे उभ्या राहून मोदी सरकारचा जयघोष करू लागल्या. दोन्हीकडून सुरू असलेल्या या जोरदार घोषणाबाजीमुळे त्याठिकाणी सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आलेल्या नागरिकांमध्ये संभ्रमाचे तर कार्यक्रम ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले.
वरील सर्व प्रकार समजताच लोणावळा शहर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान महाविकास आघाडीच्या आंदोलकांनी संकल्प यात्रेतील चित्ररथावर असलेल्या ‘मोदी सरकारची हमी’ या वाक्यावर आपला आक्षेप असल्याचे सांगत त्याबाबतीतील आपल्या निषेधाच निवेदन मुख्याधिकारी अशोक साबळे यांनी दिले. त्यानंतर महाविकास आघाडीचे कार्यकर्ते घटनास्थळावरून माघारी गेले. मात्र तोवर त्याठिकाणी पोचलेल्या शहर भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मात्र महाविकास आघाडीच्या या कृतीविरुद्ध जोरदार आक्षेप नोंदवला. तसेच सर्वसामान्य नागरिकांना सरकारी योजनांचा लाभ घेता यावा यासाठी सुरू असलेला हा कार्यक्रम बंद पाडण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला असल्याचा आरोप करीत सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध गुन्हे नोंद करावे अशी मागणी केली.
पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे हाणामारी टळली
संपूर्ण मावळ तालुक्यात विकसित भारत संकल्प यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. मात्र लोणावळा येथे घडलेल्या घोषणायुद्धामुळे तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले. जर पोलिसांनी हस्तक्षेप केला नसता तर कार्यकर्त्यांमध्ये हाणामारीही झाली असती, असे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.