लोणावळा – लोणावळा शहरात भांगरवाडी विभाग आणि सिद्धार्थनगर विभागात नुकत्याच तयार करण्यात आलेल्या रस्त्यांच्या झालेल्या दुरवस्थेच्या पार्श्वभूमीवर लोणावळा नगरपरिषद मुख्याधिकारी पंडित पाटील यांनी कठोर भूमिका घेतली आहे. या प्रकरणी कोणालाही पाठीशी घालणार नसल्याचे सांगत त्यांनी रस्त्यांच्या या दुरवस्थेला जबाबदार ठरलेल्या लोणावळा नगरपरिषदेच्या दोन अभियंत्यांचा थेट निलंबनाचा प्रस्ताव नगरपरिषद प्रशासन संचालनालय यांच्याकडे पाठवला आहे. शिवाय या रस्त्याच्या ठेकेदाराचे कामाचे बिल रोखून धरले असून त्याच्यावर देखील जास्तीत जास्त कडक कारवाई करण्याची तयारी सुरू केली आहे.
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान जिल्हास्तरीय या योजनेतून लोणावळा नगरपरिषद हद्दीमधील भांगरवाडीतील पंडीत जवाहरल नेहरु विदयालय ते नगरपरिषद हद्दीपर्यंतचा एकूण 74 लाख 67 हजार रुपये लागत असलेला रस्ता आणि सिध्दार्थनगर ते ट्रायोझ मॉलपर्यंतचा 51 लाख 66 हजार रुपये लागत असलेला रस्ता असे दोन रस्ते मागील महिन्यात तयार करण्यात आले होते. रस्ते बनविण्याचे काम शंकर रामचंद्र अर्थमुव्हर्स प्रा. लि. पुणे यांना देण्यात आले होते. मात्र दोन्ही रस्ते डांबरीकरण केल्यानंतर केवळ 15 दिवसांच्या आतच पहिल्या पावसात खराब झाले. या रस्त्यांना मोठ्या प्रमाणावर खड्डे पडून रस्त्यांची दुरवस्था झाली. यासंदर्भात नागरिकांनीा मागील काही दिवसात अनेक तक्रारी मुख्याधिकारी यांच्याकडे केल्या.
या तक्रारींची दखल घेत मुख्याधिकारी पाटील यांनी नगरपरिषद अधिकारी असलेल्या अभियंता वैशाली मठपती व विकास म्हमाणे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. यावर दोन्ही अधिकाऱ्यांनी संबंधित ठेकेदाराने सध्याच्या पावसाची परिस्थिती व काही तांत्रिक प्लॉटच्या बिघाडामुळे आणि रस्त्याचा माल खराब वापरल्यामुळे हे रस्ते पहिल्या पावसात खराब झालेले आहेत, असा खुलासा सादर केला. मात्र मुख्याधिकारी पाटील यांनी हा खुलासा अमान्य केला आहे.
नगरअभियंता बांधकाम यांनी रस्ता डांबरीकरणाचा माल खराब असल्या कारणाने तो वापरु न देणेकामी संबंधित ठेकेदारास लेखी व तोंडी कळविणे आवश्यक होते. तसेच संबंधित ठेकेदाराकडून हे मटेरियल बदलून घेणे आवश्यक होते. मात्र तसे झाले नाही. शिवाय वरील दोन्ही अभियंत्यांनी हे काम सुरु असतांना स्वतः सुपरव्हिजन केलेले नसल्याचेही मान्य केले आहे.
या कामाचा दोष दायित्व कालावधी दोन वर्ष असताना दोन्ही रस्ते 15 दिवसांतच खराब झाले असल्याचे निरीक्षण नोंदवीत मुख्याधिकारी पंडित पाटील यांनी नगरपरिषद अभियंता वैशाली मठपती व विकास म्हमाणे यांना कर्तव्यात कसूरवार ठरवित त्यांच्यावर महाराष्ट्र नागरी शिस्त व अपील 1979 मधील तरतुदीनुसार निलंबनाची कारवाई आयुक्त तथा संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय यांच्याकडे प्रस्तावित केली आहे.
महत्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे
रस्ता तयार करण्यासाठी ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचा माल वापरला.
अभियंत्यांनी स्वत: सुपरव्हिजन केले नाही.
दोन वर्षांचे दायित्व असताना पंधरा दिवसांतच रस्ते उखडले.
1 कोटी 26 लाख,33 हजारांचे दोन रस्त्याचे काम.
रस्ता दुरवस्थेला जबाबदार धरत दोन अभियंत्यांच्या निलंबनाचा ठराव सादर.