Punjab Loksabha 2024 – 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पंजाबच्या राजकारणात मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. अकाली दल पुन्हा एकदा एनडीएमध्ये परतण्याची शक्यता व्यक्त केली जात आहार. समोर आलेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीसाठी युती आणि जागावाटपाबाबत अकाली दल आणि भाजपच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे. देशात एप्रिल-मे महिन्यांदरम्यान लोकसभा निवडणुका आयोजित केल्या जाऊ शकतात.
समोर आलेल्या माहितीनुसार, भाजपला लोकसभा निवडणुकीत पंजाबमध्ये जास्त जागा हव्या आहेत. यावेळी दोन्ही पक्षांमध्ये पूर्वीच्या फॉर्म्युल्यावर चर्चा न होता नवीन पर्यायासाठी प्रयत्न सुरु असल्याचे समजते. नव्या फॉर्म्युल्यानुसार भाजपला लोकसभेत जास्त जागा हव्या आहेत. दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपाची चर्चा झाली, तर लवकरच पक्षाचे नेते युतीबाबत अधिकृत घोषणा करू शकतात.
अकाली दल एनडीएपासून का वेगळा झाला?
पंजाबमधील प्रबळ सर्व शिरोमणी अकाली दल हा 1997 ते सप्टेंबर 2020 पर्यंत भाजपचा जुना मित्र होता. मात्र, 2020 मध्ये हरसिमरत कौर बादल यांनी तीन कृषी कायद्यांच्या निषेधार्थ केंद्र सरकारच्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर काही दिवसांनी दोन्ही पक्ष वेगळे झाले. नंतर शेतीविषयक कायदे मागे घेण्यात आले. पंजाब विधानसभेची निवडणूकही दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे लढवली होती.
आरएलडी, टीडीपीही संपर्कात
दुसरीकडे, जयंत चौधरी यांचा आरएलडीही लोकसभा निवडणुकीच्या 2024 संदर्भात भाजपच्या संपर्कात आहे. दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपाच्या मुद्द्यावर चर्चा झाली असून ते एकत्र निवडणूक लढवू शकतात. याशिवाय आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे देखील भाजपच्या संपर्कात आहेत. भाजप आणि तेलुगु देसम पक्ष पुन्हा एकदा एकत्र निवडणूक लढवू शकतात, असे मानले जात आहे. दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपावरही चर्चा सुरू असल्याचे देखील समोर आले होते.