Lok Sabha Election 2024 । देशातील राजकीय महासंग्राम म्हणून पाहिल्या जाणाऱ्या लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला. त्यामुळे पुढील अडीच महिने ऐन उन्हाळ्यात देशात इलेक्शन फिव्हरचा पारा वाढलेला दिसेल. देशाचे सत्ताधीश ठरवणारी निवडणूक असल्याने ती अतिशय अटीतटीने लढवली जाईल. सर्वच राजकीय पक्ष पूर्ण ताकदीने त्या महासंग्रामात उतरतील.
पण, खऱ्याअर्थी महासंग्रामावर प्रभाव टाकतील ते देशातील १० राजकीय रणधुरंदर. त्या यादीत अर्थातच अग्रस्थानी आहेत ते पंतप्रधान नरेंद्र मोदी. त्यांच्याशिवाय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, कॉंग्रेस नेते राहुल गांधी, कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, ज्येष्ठ नेते शरद पवार, तामीळनाडूचे मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन, राजदचे नेते तेजस्वी यादव आणि एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांच्याकडे निवडणुकीवर परिणाम करू शकणारे नेते म्हणून पाहिले जात आहे.
* नरेंद्र मोदी: संपूर्ण निवडणूक मोदी या नावाभोवतीच फिरणार आहे. सलग तिसरा कार्यकाळ मिळण्याच्या प्रचंड विश्वासातून ते निवडणुकीसाठी सज्ज झाले आहेत. विकसित भारताच्या दिशेने कूच करण्याचा संकल्प त्यांनी जाहीर केला आहे. त्यातून मोदी की गॅरंटी हा प्रचारातील प्रमुख मुद्दा बनलेला दिसेल. सलग तिसरा विजय मिळवून देशाचे पहिले पंतप्रधान पं.जवाहरलाल नेहरू यांच्या रेकॉर्डची बरोबरी करण्याची संधी साधण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.
* अमित शहा: मोदींचे विश्वासू सहकारी असणारे शहा केंद्रीय मंत्रिमंडळातील नंबर २ या स्थानावर विराजमान झाले आहेत. भाजपचे चाणक्य म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. महासंग्रामातील भाजपच्या राजकीय चालींमागील ब्रेन तेच असतील. मोदी सरकारने कलम ३७०, सीएए कायद्याच्या संदर्भात महत्वाची पाऊले उचलली. ते महत्वाचे विषय मार्गी लावण्यात शहांचे योगदान महत्वाचे ठरले.
* राहुल गांधी: मागील निवडणुकीतील पीछेहाटीनंतर राहुल यांनी कॉंग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. मात्र, भारत जोडो यात्रेमुळे त्यांची प्रतिमा उजळून निघाली. आता भारत जोडो न्याय यात्रेतून ते पुन्हा थेट जनतेत गेले. त्यांच्या यात्रा कॉंग्रेसमध्ये नवचैतन्य निर्माण करणाऱ्या ठरल्या आहेत. मोदींचे प्रमुख राजकीय प्रतिस्पर्धी म्हणून सगळेच त्यांच्याकडे पाहत आहेत.
* मल्लिकार्जुन खर्गे: एक सामान्य कार्यकर्ता म्हणून वाटचाल सुरू करणारे खर्गे थेट कॉंग्रेससारख्या देशातील प्रमुख राजकीय पक्षाचे अध्यक्ष बनले. एकप्रकारे ते राजकीय निष्ठेचे प्रतीक बनले आहेत. भाजपचा विजयरथ वेगाने दौडत असताना आणि कॉंग्रेस अस्तित्वाची लढाई लढत असताना त्यांच्याकडे पक्षाची धुरा आली. आव्हानात्मक काळात ते पक्षाचे नेतृत्व सक्षमपणे करत आहेत.
* ममता बॅनर्जी: फायरब्रँड नेत्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ममतांनी एकला चलो रे ही भूमिका स्वीकारली आहे. त्यांचा तो निर्णय विरोधी पक्षांच्या इंडिया या आघाडीला धक्का देणारा ठरला. मात्र, आपला प्रमुख लढा भाजपशी असल्याच्या भूमिकेवर त्या ठाम आहेत. स्वबळावर लढून त्या भाजपसमोर कितपत आव्हान उभे करणार याविषयी संपूर्ण देशभरात उत्सुकता आहे.
* नितीश कुमार: सातत्याने राजकीय कोलांटउड्या मारणारे नेते अशी प्रतिमा बनूनही नितीश बिहारची सत्ता राखण्यात प्रदीर्घ काळ यशस्वी ठरले आहेत. इंडियाच्या स्थापनेत महत्वाची भूमिका निभावणाऱ्या नितीश यांनी त्या आघाडीला जोर का झटका दिला. त्यांनी पुन्हा भाजपशी मैत्री केली. त्यामुळे बिहारमध्ये काय परिणाम होणार ते लोकसभा निवडणुकीतून दिसून येणार आहे.
* शरद पवार: स्वपक्षात फूट पडल्यानंतरही पवार ठामपणे आणि निश्चयाने राजकीय लढाईसाठी सज्ज झाले आहेत. कधीच हार न मानण्याच्या बाण्यामुळे त्यांच्याकडे महाविकास आघाडीचा प्रमुख आधार म्हणून पाहिले जात आहे. ती आघाडी महाराष्ट्रातील सत्तारूढ महायुतीपुढे मोठे आव्हान उभे करेल असे चित्र आहे. त्या आघाडीच्या दृष्टीने पवारांची पॉवर महत्वाची मानली जात आहे.
* एम.के.स्टॅलिन: इंडियातील महत्वाचा घटक असणाऱ्या द्रमुकच्या नेतृत्वाखालील आघाडीची तामीळनाडूत सत्ता आहे. ते राज्य इंडियाची लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी होण्यासाठी कळीचे ठरणार आहे. मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळत असणाऱ्या स्टॅलिन यांच्यावर जनता किती खुष आहे यावर प्रामुख्याने इंडियाची कामगिरी ठरेल. स्टॅलिन विरोधकांसाठी महत्वाचे आहेत.
* तेजस्वी यादव: राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांचे राजकीय वारसदार असणारे तेजस्वी बिहारच्या राजकारणातील महत्वाचा चेहरा बनले आहेत. नितीश यांच्या कोलांटउडीमुळे तेजस्वी यांना उपमुख्यमंत्रिपद गमवावे लागले. त्यांना पुन्हा विरोधी बाकांवर बसणे भाग पडले. मात्र, मोठा जनाधार पाठिशी असल्याने तेजस्वी यांना इंडिया आघाडीमधील महत्वाचे नेते मानले जाते.
* असदुद्दीन ओवैसी: आवैसी यांनी तेलंगणाबाहेर त्यांच्या एमआयएम या पक्षाचा विस्तार केला आहे. भाजपची बी-टीम म्हणून त्यांच्या पक्षावर टीका केली जाते. त्याचे कारण म्हणजे त्यांनी अनेकदा विरोधकांची समीकरणे बिघडवलेली दिसतात. अर्थात, पक्षविस्ताराच्या अधिकारावर बोट ठेवत ते टीकेकडे दुर्लक्ष करतात. यावेळीही ओवैसी यांच्या पक्षाच्या कामगिरीकडे लक्ष असेल.