विश्रांतवाडी : कोरोना आजाराचा वाढता फैलाव पाहता लॉक डाऊन काळातच लोहगावकारांनी स्वयंस्फूर्तीने दि.७ ते ९ एप्रिल पर्यंत जनता कर्फ्युची हाक दिली आहे. त्याला पहिल्याच दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला.
लोहगाव परिसरात लॉक डाऊन असून देखील भाजी, किराणा माल आदी साहित्य खरेदी करण्याच्या निमिताने रस्त्यावर सर्वत्र गर्दी होत होती. सोशल डिस्टंसिंग पाळले जात नाही. त्यामुळे कोरोना आजाराचा फैलाव होईल या भितीने लोहगावकरानी जनता कर्फ्यु ची हाक दिली होती. मंगळवार दि.७ ते गुरुवार दि.९ एप्रिल पर्यंत स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्याचे आवाहन केले होते.
यामध्ये भाजी मार्केट, किराणा दुकानदार, बेकरी, चिकन-मटण विक्रेते आदी सर्वांनी जनता कर्फ्यु मध्ये स्वयंस्फुर्तीने बंद ठेवण्याची तयारी दर्शवली. हॉस्पिटल, मेडिकल, पाणी सेवा, दुध केंद्र बंद मधून वगळण्यात आली आहेत. त्यानुसार आजच्या पहिल्या दिवशी बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. यापुढे देखील शंभर टक्के बंद पाळण्यास प्रतिसाद द्यावा असे आवाहन समस्त लोहगाव मधील नागरिकांनी केले आहे.
दरम्यान, लोहगाव परिसरातील गोर गरीब, कामगार वर्ग उपाशी राहू नये म्हणून पांडुरंग खेसे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्नदान मंडळ स्थापन करण्यात आले आहे. त्याद्वारे सेंट्रल किचन करून रोज अकरा ठिकाणी दोन्ही वेळचे मिळून चार हजार जणांना अन्नदान वाटप केले जाते. नागरिकानी दिलेल्या देणगीतून अन्नदान रोज सुरू आहे.
पोलीसांची नाकाबंदी चौकी समोरच
बंद काळात पोलीसानी मुख्य रस्त्यावर नाका बंदी करणे आवश्यक असताना केवळ लोहगाव मधील चौकी समोरच नाका बंदी केली आहे. वाघोली रस्ता, धानोरी रस्ता, वडगावशिंदें रस्ता अशा ठिकाणी नाका बंदी आवश्यक असताना केवळ चौकी समोरच नाका बंदी केली आहे. पोलिसांचा लोहगाव मध्ये वचक नसल्यानेच शंभर टक्के जनता कर्फ्यु घ्यावा लागला असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. बंद काळात तरी पोलिसांनी विनाकारण फिरणाऱ्यावर व वाहनांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.