मुंबई – राज्यात करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन होणार अशी शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे मुंबईत आज झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या बैठकीत लॉकडाऊन होणार नसल्याचे स्पष्ट केलं आहे. मात्र काही निर्बंध लावण्यात आले आहे. तर विकेंडमध्ये लॉकडाऊन असणार आहे.
राज्यात उद्यापासून कडक निर्बंध लावण्यात येणार आहेत. आठवड्याचे पाच दिवस कडक निर्बंध आणि शनिवार-रविवार कडक लॉकडाऊन करण्यात येण्याबाबत निर्णय घेण्यात आला. उद्या सायंकाळी 8 वाजल्यापासून नियमावली लागू होईल. उद्योग व्यवसायांना कंपनीच्या वेळा ठरविण्यात येणार आहेत. सिनेमागृहे, नाट्यगृह बंद राहणार आहेत. कंपन्यांमध्ये कोरोना रुग्ण सापडला तर त्याची जबाबदारी कंपनी मालकाची असेल, असं सांगण्यात आलं आहे. रात्रीच्या वेळी अत्यावश्यक सेवांनाच संचार करण्यास मुभा देण्यात येणार आहे.
सार्वजनिक वाहतूक ५० टक्क्यांच्या अटीवर सुरू राहणार आहे. तर हॉटेलमध्ये केवळ पार्सल सेवा सुरू राहिल. मॉल्स, हॉटेल रात्री बंद राहतील. गृहनिर्माण क्षेत्राची कामं सुरू राहणार आहेत.