पुणे: महाराष्ट्रातील कोरोना विषाणूमुळे लावलेले लॉकडाऊन हटविण्यासाठी महाराष्ट्र सरकारने 10 ऑगस्टपर्यंत निर्णय घ्यावा, नाहीतर आंदोलन सुरू केले जाईल. असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
शिवसेनेच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार साथीच्या कोरोनाचा सामना करण्यास “असक्षम” असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले. राज्यातील कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे महाराष्ट्र सरकारने गेल्या आठवड्यात लॉकडाऊन 31 ऑगस्टपर्यंत वाढविला आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, राज्य सरकारने हॉटस्पॉट घोषित केलेल्या भागांमध्ये यावर्षीपेक्षा गेल्यावर्षी म्हणजेच 2019 साली जास्त लोकांचा मृत्यू झाला. केंद्रीय आरोग्य विभागाची ही माहिती आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात निर्बंध का लादले आहेत, हे स्पष्ट केले पाहिजे. लोक आधीच आर्थिक मंदीचा सामना करत आहेत. म्हणून सरकारने लोकांना स्वतःचा व्यवसाय आणि उपक्रम सुरू करण्याची मुभा दिली पाहिजे. जर सरकारने 10 ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन उठविला नाहीतर आम्ही रस्त्यावर उतरुन कायदा हातात घेऊ, असा इशारा प्रकाश आंबेडकरांनी दिला.
मुख्यमंत्र्यांबद्दल एका प्रश्नावर आंबेडकर म्हणाले, “जात किंवा धर्माचा नेता होणे शक्य आहे. पण उद्धव ठाकरे यांनी राज्याचा नेता बनले पाहिजे. ”
प्रकाश आंबेडकर म्हणाले, दुकानांची सम-विषम ही पद्धत कधी संपवणार आहात? छोटे दुकानदार, टपरिवाले यांची उपासमार होत आहे. एसटी महामंडळ संकटात आहे. एसटीच्या कर्मचाऱ्यांना दोन महिने पगार नाही. एसटी कधी धावणार, हे सरकारने सांगावे.
80 टक्के लोकांच्या शरीरात अँटीबॉडी तयार झाल्या आहेत. 5 टक्के लोकांसाठी 95 टक्के लोकांना वेठीस का धरता? सरकारने आता लॉकडाऊन का?, असा प्रश्न प्रकाश आंबेडकरांनी उपस्थित केला.
कोरोना-कोरोना करण्याऐवजी पुराचे नियोजन करा. मुंबईत झोपडपट्टीत आणि इमारतीत पाणी घुसेल. लोकांचे हाल होत आहेत. या महिन्यात पाऊस 15 दिवस पडणार असल्याचा अंदाज आहे. कृष्णा, गोदावरी, वैनगंगा या नद्यांच्या खोऱ्यातील धरणं 40 ते 70 टक्के भरले आहेत. पुराचा प्रश्न निर्माण होणार आहे. मुंबईत झोपडपट्टीत आणि इमारतीत पाणी घुसेल. तरीही सरकार गंभीर नसल्याची टीका प्रकाश आंबेडकरांनी केली.
सध्या सर्व राम भरोसे सुरु आहे. सरकारी पातळीवर निर्णय घेतले जात नाहीत. कलेक्टर निर्णय घेतात, हे पूर्ण चुकीचं आहे. सरकारने याबाबत निर्णय घ्यावा. राज्य सरकार आणि केंद्र सरकार चालढकल करत आहेत. निर्णय घेण्याची क्षमता नसल्याने देशाला मोठा आर्थिक फटका बसत असल्याचे, आंबेडकर म्हणाले.