सायंकाळी पाचपर्यंतची वेळ असूनही दुकाने, भजीविक्री रात्री आठपर्यंत सुरूच
आळंदी – करोनाच्या पार्श्वभूमीवर आळंदी शहारात ठरवून दिलेल्या जागेत भाजी विक्री न करताना विक्रेते बिधास्तपणे पदपथावर आपले दुकान मांडत आहेत. येथे विक्रेत्यांसह ग्राहकांकडून सोशल डिस्टन्सिंगसह इतर सर्व नियमांना हरताळ फासले जात असूनही नगरपरिषदेची “हाताची घडी तोंडावर बोट’ असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
आळंदीत करोनाचा फैलाव रोखण्यासाठी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत दुकाने उघडी ठेवण्याची व भाजी विक्रीची मुभा दिली आहे. मात्र, त्यास बगल देत रात्री 8 वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यात येत आहे. दरम्यान, पालिकेने चार नंबर शाळेचे मैदान भाजी विक्रेत्यांसाठी खुले करून दिले आहे. तरी भाजीविक्रेते या जागेत न बसता दुपारी 12 वाजेपर्यंत पदपथावर व त्यानंता रात्री सातपर्यंत प्रदक्षिणा मार्गावरील पाण्याच्या टाकी जवळील पदपथावर दुकाने थाटत असून नागरिकही याठिकाणी गर्दी करीत आहेत. मात्र, पालिकेकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने करोनाचा फैलाव कसा रोखणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.
- भाजी विक्रेत्यांना निर्धारीत वेळ आणि जागा दिली आहे. तरी देखील ते पालिकेची कोणतीही परवानगी न घेता अतिक्रमण करीत आहेत. तरी गुरुवार (दि. 8) पासून या विक्रेत्यांवर धडक दंडात्मक कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार आहेत.
– राम खरात, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, आळंदी नगरपालिका