राज्यशास्त्राचा जनक अरिस्टोटल म्हणतो की माणूस हा समाजशील प्राणी आहे, तो समाजाशिवाय राहू शकत नाही, असं म्हणत असताना कोरोनाने अरिस्टोटललच्या या मताला काही काळासाठी का होईना पण छेद दिला आहे. जगभरातील देशावर कोरोनाचे सावट असताना, अनेक लहान मोठ्या देशांनी या संकटाला रोखण्यासाठी लॉकडाऊनचा निर्णय घेतलेला आहे, कारण यामुळेच कोरोना नियंत्रणात येणार आहे, आपल्याला जिवंत राहायचं असेल तर प्रत्येकाला समाजापासून वेगळं राहावं लागणार आहे.
लॉकडाऊनने आपल्याला काय शिकवलं असा प्रश्न या काळात पडणं साहजिक आहे, लॉकडाऊनने माणसाला स्वतः च्या अंतर्मनात डोकवायला भाग पाडले आहे. पद ,पैसा, संपत्तीच्या मागे धावणाऱ्या माणसाला विचार करायला लावलं आहे,
वाढत्या कामामुळे कुणालाच कुणासाठी वेळ देता येत नाही अशी कुजबुज घराघरांतून ऎकायला येते, या निमित्ताने प्रत्येकाला आपोआपल्या कुटूंबासाठी वेळ देता येत आहे, स्पर्धेच्या या युगात माणसामाणसांत धावण्याची अप्रत्यक्ष स्पर्धा लागलेली होती, थांबला तो संपला असं म्हणत असताना लॉकडाऊनच्या काळात जो घरात थांबला तोच वाचला अशी परिस्थिती कोरोनाने तयार केली आहे, समाजात रूढ झालेली अनेक गृहीतके कोरोनामुळे बदलली आहे.
लॉकडाऊनच्या काळात अनेक उद्योगधंदे ठप्प असताना फक्त एकच व्यवसाय सुरू आहे तो म्हणजे शेती.सध्या माणसाला चैनीच्या वस्तूची आवश्यकता नाही तर त्याला जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या अन्नधान्यांची गरज आहे, म्हणून शेतीला दुय्यम समजणाऱ्या पांढरपेशा वर्गाला या निमित्ताने शेतीचे महत्व कळायला लागेल, शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा का म्हणतात ते कळायला लागेल, सद्याच्या घडीला आपल्या खिशात किती पैसे आहेत हे महत्वाचे नाही तर अन्नधान्य वेळेवर उपलब्ध होईल का नाही याची चिंता लागलेली आहे.
माणूस हा चळवळ्या असतो, नेहमी काहीतरी करण्याची उर्मी त्याच्यात असते, यानिमित्ताने आपल्या आवडीच्या कामात व्यस्त राहण्याशिवाय त्याच्याकडे दुसरं कोणतंच साधन नाही, माझी नाळ शेतीशी जुळली असल्यामुळे सद्या कुटूंबासोबत शेतातच राहायला आलो आहे, पुण्यात शिकण्यासाठी असल्यामुळे वर्षोवर्षे शेताकडे येणं होत नाही, लॉकडाऊनमुळे पुन्हा शेतात काम करण्याची संधी मिळाली आहे, यानिमित्ताने आई – वडीलाच्या कामाला हातभार लावता येत आहे, खोळंबलेली कामे झपाट्याने पूर्ण होत आहेत, शेतीच्या कामामुळे खरंच आपण पुण्यात शिकायला आहोत याची देखील जाणीव होत नाही. हा लॉकडाऊन आपल्या सर्वांसाठी नवीन आहे, तेव्हा प्रत्येकाला स्वतः च्या अंतर्मनात डोकवायची हीच संधी आहे.
– विष्णू नाझरकर
कॉलेज रिपोर्टर
राजशास्त्र विभाग
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ