आळंदी(वार्ताहर) – खेड तालुक्यातील करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत आहे. महिनाभरात बाधितांची संख्या शंभरी पार झाली आहे. तर आळंदी शहरातही बाधितांची संख्या वाढत असल्याने शहर पुन्हा लॉकडाऊन करा, अशी मागणी नगरसेवक सचिन गिलबिल, आळंदी विकास युवा मंच यांनी निवेदनामार्फत नगरपरिषद तसेच प्रांताधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
आळंदीत पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांना करोनाची लागण झाली आहेत. तर काही दिवसांपूर्वी एक महिला करोना मुळे मृत झाली आहे, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने शहरात पुन्हा एकदा आठ दिवस लॉकडाऊन करण्यात यावे, असे निवेदनात नमूद केले आहे. दरम्यान, शहरातील आसपासच्या गावातील नागरिकांचा वावर वाढला असून, यावर सुद्धा प्रशासनाने प्रतिबंध घातला पाहिजे, शासनाने दिलेल्या निर्धारित वेळेतच दुकाने उघडली आणि बंद केली पाहिजे यावर प्रशासनाने लक्ष ठेवले पाहिजे.
हे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालकडे पाठवले जाईल त्यांनी परवानगी दिली तर लॉकडाऊन संदर्भात विचार होऊ शकतो. स्थानिक प्रशासनाला लॉगडाऊन जाहीर करण्याचा अधिकार नाही, असे आळंदी नगरपरिषदचे मुख्याधिकारी समीर भूमकर म्हणाले.