पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून कर्ज घेण्यासाठी शेतकऱ्यांचा बँकांकडून होणारा जाच आता कमी होणार आहे. केंद्र सरकारने देशातील केवळ दोनच जिल्ह्यांमध्ये एक अनोखा प्रयोग राबविण्याचे ठरविले आहे. ॲग्री स्टॅक या ॲपच्या माध्यमातून केवळ एका क्लिकवर आणि दहा मिनिटांमध्येच दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मंजूर होणार असून, ते विनातारण थेट शेतकऱ्यांच्या खात्यातही जमा होणार आहे.
महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात या उपक्रमाची नुकतीच सुरुवात केली आहे. या उपक्रमाच्या यशस्वितेनंतर राज्यातील इतर जिल्ह्यांतही हा उपक्रम राबविण्याचा सरकारचा मानस आहे.
शेतीसाठी कर्ज काढण्यासाठी बँकांचा जाच मोठा असतो. कर्ज मंजूर करून घेण्यासाठी शेतकऱ्यांना अनेक हेलपाटे मारावे लागतात. त्यातही तारण काय द्यायचे, हा मोठा प्रश्न असतो. पीक कर्ज काढतानाही अनेक बँका आर्थिक विवरण पत्रे भरून घेतात.
याचा तोटा पीएम किसान सन्माननिधी मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना होत आहे. शेतकऱ्यांना प्राप्तीकर भरण्याची अट नसतानाही बँका अशा अटी लादून पीक कर्ज देण्यात टाळाटाळ करतात. शेतकऱ्यांची ही समस्या ओळखून केंद्र सरकारने एक अनोखा प्रयोग राबविण्याचे ठरविले आहे.
मोबाईलमध्ये ॲप डाऊनलोड केल्यानंतर नाव आणि आधार क्रमांक टाकल्यावर एसएमएसद्वारे आलेल्या ओटीपीतून त्याची पडताळणी केली जाईल, तसेच फेस आयडीच्या माध्यमातून शेतकऱ्याची खात्री पटविण्यात येईल. त्यानंतर शेतकऱ्याला कर्ज हवे असल्यास, तशी माहिती भरून खाते असलेल्या बँकांच्या कर्जाची ऑफर शेतकऱ्याला दिसू शकेल. त्यातील एक ऑफर स्वीकारून केवळ दहा मिनिटांत त्यावर प्रक्रिया करून हे कर्ज शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर जमा केले जाणार आहे.
किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून एक लाख साठ हजार रुपयांपर्यंतच्या कर्जाला कोणतेही तारण लागत नाही, तसेच या कर्जाची नोंद सातबारा उताऱ्यावर देखील केली जात नाही. ही प्रक्रिया स्वयंचलित पद्धतीने होणार असल्याने शेतकऱ्याला घरबसल्या हे कर्ज बँकांच्या जाचाशिवाय मिळणार आहे.
या प्रक्रियेत राष्ट्रीय खासगी, तसेच सहकारी बँकांचा देखील समावेश करण्यात आला आहे. सातबारा उतारा आधार कार्डशी लिंक केलेल्या शेतकऱ्यांची संख्या जादा असलेल्या जिल्ह्यांमध्ये हा उपक्रम राबविला जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.