पळसदेव, (वार्ताहर) – आम्ही मंत्री असताना तालुक्यात खडकवासला कालव्याला नियमित पाणी यायचे. आता खडकवासला, सणसरण कट, बावीस गावांचे पाणी गेले कोठे? याहून गंभीर परिस्थिती उजनीची आहे. सोलापूरला पिण्याच्या पाण्यासाठी अर्धा टीएमसी पाण्याची गरज असताना नदीतून सहा टीएमसी पाणी सोडले जात आहे. याकडे कोणाचे लक्ष नाही. परिणामी तालुक्यातील शेतकर्यांचे प्रपंच अडचणीत आले आहेत.
2014 मध्ये तालुक्यातील शेतकर्यांचे वार्षिक उत्पन्न साडेचार हजार कोटी रुपये होते, ते आता 1200 कोटींवर आले आहे. शेतकर्यांच्या उत्पन्नात झालेल्यी घट ही तालुक्यातील लोकप्रतिनिधींच्या निष्क्रीयतेच प्रतिक असल्याची घणाघाती टीका मजी सहकारमंत्री तथा भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी आमदार दत्तात्रय भरणे यांच्यावर केली.
पळसदेव येथे आयोजित मेळाव्यात पाटील बोलत होते. कार्यक्रमास तालुक्यातील भाजपासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. हर्षवर्धन पाटील म्हणाले की, देशात भाजपची सत्ता तर राज्यात भाजपने मित्र पक्षांसमवेत सत्ता स्थापन केली असल्याचे वास्तव असताना इंदापूर तालुक्यात मात्र महायुतीचे नाव कोणी घेत नाही.
निधी आणण्यात जाणीवपूर्वक अन्याय केला जात आहे. माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर अन्याय झाला असून तो आता शिगेला पोहोचला आहे. तालुक्यातील शेतकर्यांची सिंचनाची अवस्था गंभीर आहे. 15 डिसेंबरला 65 टक्के पाणीसाठा असलेल्या उजनी धरणात आता मायनस 18 टीएमसी पाणी झाले आहे,
याला जबाबदार कोण? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. शेतकर्याला शेतीला वीज, पाणी व कच्च्या मालाचे पक्क्या मालात रुपांतर एवढ्याच गोष्टींची आवश्यकता आहे. बाकी काबाडकष्ट करायची त्याची तयारी असते; मात्र शेतकर्यांच्या हक्काचे पाणी गायब झाले आहे. आमदाराच्या निष्क्रियतेमुळे तालुक्यातील धरणग्रस्तांचा मोठ नुकसान झाले आहे. याला कोण जबाबदार आहे.
ते कायम तुमच्या सोबत राहतील का?
इंदापूर तालुक्यातील तलावांमध्ये गेल्या 10 वर्षांत खडकवासला कालव्याचा एक टिपूसही पाणी आले नाही. याचा मात्र कमिशनचा धंदा जोरात सुरू असून पक्ष प्रवेश करणार्यांना दोन कोटींची ऑफर दिली जाते. यामुळे आमच्यातले काहीजण गेले आहेत. पण त्यांना ठेका देवूनही ते कायम तुमच्यासोबत राहतील का? असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला.