ठेवीदार चिंतेत : काही जणांना पैसे मिळाले, काहींना टोकन
पिंपरी -“येस’ बॅंकेवर रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने लादलेल्या आर्थिक निर्बंधामुळे आज पिंपरी-चिंचवडमधील बॅंकेच्या शाखांमध्ये खातेदारांनी पैसे काढण्यासाठी गर्दी केली होती. खातेदारांना 50 हजारापेक्षा जास्त रक्कम काढता येणार नसल्याने त्यांच्यामध्ये चिंतेचे वातावरण होते. बॅंकेमध्ये रांगेत थांबलेल्या सर्वच खातेदारांना आज पैसे मिळाले नाही. त्यांना टोकन देऊन परत पाठविण्यात आले. ज्यांना पैसे मिळाले नाही त्यांनी बॅंक व्यवस्थापनाला याबाबत विचारणा केली.
केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या सुचनेनुसार येस बॅंकेवर 3 एप्रिलपर्यंत निर्बंध लादण्यात आले आहे. संबंधित कालावधीत बॅंकेच्या खातेदारांना 50 हजार रुपयेच काढता येणार आहे. या निर्णयाने धास्तावलेल्या खातेदारांनी आज बॅंकेच्या वाकड आणि चिंचवड येथील शाखांमध्ये सकाळपासून पैसे काढण्यासाठी गर्दी केली होती. रांगेत थांबलेल्या सर्वच खातेदारांना आज पैसे मिळू शकले नाही.
ज्यांना पैसे देण्यात आले नाही त्यांना टोकन देऊन घरी परत पाठविण्यात आले. पैसे न मिळालेल्या खातेदारांनी बॅंक व्यवस्थापनाची भेट घेऊन याबाबत विचारणा केली. तुमचे पैसे सुरक्षित आहेत. घाबरण्याचे कारण नाही, असे बॅंक व्यवस्थापनाने त्यांना सांगितले.
तसेच, टोकन क्रमांकानुसार खातेदारांना पैसे दिले जातील, असे स्पष्ट करण्यात आले. बॅंकेच्या एटीएममधून पैसे मिळणे बंद झाले आहे.
नोकरदारांमध्ये चिंतेचे वातावरण
बॅंकेत खाते असलेल्या नोकरदारांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. ज्या नोकरदारांचा पगार पन्नास हजार रुपयांच्या आत आहे, त्यांना एटीएममधून पैसे मिळणार नसल्याने रांगेत थांबून पैसे काढावे लागणार आहे. तर, पन्नास हजार रुपयांपेक्षा जास्त पगार असलेल्या पगारदारांना मात्र पन्नास हजार रुपयांपर्यंतच पैसे मिळणार असल्याने त्यांना उर्वरित रक्कम सध्या काढणे शक्य होणार नाही.
तसेच, ज्यांची बॅंकेत दोन खाती आहेत त्यांना दोन्ही खात्यात मिळून पन्नास हजार रुपयांपर्यंतच पैसे मिळू शकणार आहेत. ज्या नोकरदारांचा पगार 7 तारखेला जमा होतो, त्यांचा पगार कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांच्या अन्य खात्यातील बॅंकेत जमा केला जाऊ शकतो. अथवा, कर्मचाऱ्यांना पगाराच्या रकमेचा धनादेश देण्याचा पर्यायही कंपन्या स्वीकारू शकतात. परंतु यात उशीर झाल्यास कर्मचाऱ्यांना पगार मिळण्यास उशीर होऊ शकेल.