उस्मानाबाद – नाईक आत्महत्या प्रकरणातील कारवाई प्रमाणेच आपले पती दिवंगत दिलीप ढवळे यांच्या आत्महत्येस जबाबदार असणाऱ्या शिवसेना खासदार ओम राजेनिंबाळकर यांच्यासह इतर आरोपींवर तत्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची पत्नी वंदना ढवळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, ढवळे कुटुंबीयांनी आज उस्मानाबाद येथे पत्रकार परिषद घेत गेल्या वर्षभरापासून रखडलेल्या पोलीस तपासाबाबत संताप व्यक्त केला. यावेळी शेतकरी दिवंगत दिलीप ढवळे यांच्या पत्नी वंदना ढवळे यांनी, अन्वय नाईक यांना न्याय, तर आम्ही काय घोडे मारले? असा संतप्त सवाल उपस्थित केला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकांवेळी ढवळे कुटुंबियांना न्याय देण्याच्या वचनाचीही आठवण करून दिली.
काय म्हणाल्या वंदना ढवळे?
‘आर्थिक फसवणूक व मानहानी झाल्याने आपले पती दिलीप ढवळे यांनी गळफास घेत आत्महत्या केली. आपल्या आत्महत्येस ओम राजेनिंबाळकर आणि विजय दंडनाईक जबाबदार असल्याचे त्यांनी आत्महत्येपूर्वीच्या चिठ्ठीत लिहून ठेवले होते. मात्र तरीही घटना घडल्यानंतर तब्बल पाच महिन्यांनी गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होवून वर्षभराचा कालावधी लोटला आहे. मात्र अद्याप पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले नाही’ अशी खंत वंदना ढवळे यांनी बोलून दाखवली.
ढवळे कुटुंबाला मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा
मुख्यमंत्री संवेदनशील आहेत. नाईक कुटुंबीयांचे गार्हाणे ऐकून त्यांनी तत्काळ कारवाई केली. अगदी त्याचप्रमाणेच आरोपी असलेल्या स्वतःच्या पक्षातील खासदाराला पाठीशी न घालता ते आम्हा कुटुंबीयांना न्याय मिळवून देतील, अशी अपेक्षा दिलीप धावले यांचे बंधू राज यांनी व्यक्त केली.