जयपूर – पावसाळ्याच्या दिवसांत आकाश वीजा चमकत असताना अथवा ढगांचा गडगडाट होत असताना सेल्फी काढण्याचा मोह किती महागात पडू शकतो हे जयपूरमध्ये दिसून आले आहे.
राजस्थानमधील आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास जयपूरमध्ये दमदार पावसाने हजेरी लावली. याचदरम्यान अमेर किल्ल्याजवळ काही तरुण-तरुणींचा ग्रुप पावसाचा आनंद घेत होते. याचवेळी वॉच टॉवरवर सेल्फी घेणाऱ्या तरुणांच्या अंगावर वीज कोसळून यातील ११ जणांचा जागीच मृत्यू झाला तर ८ जण जखमी झाले.
या घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन विभागाचे जवान आणि स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयामध्ये दाखल केलं. अशी माहिती जयपूरचे पोलिस आयुक्त आनंद श्रीवास्तव यांनी दिली आहे.
अमेर किल्ल्याजवळ वीज कोसळून झालेल्या दुर्घटनेतील जखमींच्या उपचाराचा आढावा घेण्यासाठीर राजस्थानचे आरोग्यमंत्री डॉ. सवाई मानसिंग (एसएमएस) रुग्णालयात पोहोचले. यावेळी चीफ व्हिप डॉ.महेश जोशी, आमदार अमीन कागजी हे उपस्थित होते. जखमींच्या उपचारासाठी त्यांनी आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत.
राजस्थानमध्ये रविवारी वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून झालेल्या दुर्घटनेत तब्बल २० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तर २१ जण जखमी झाले आहेत. राजस्थानच्या जयपूर, झालावाड आणि धौलपूर जिल्ह्यात या वीज दुर्घटना घडल्या आहेत. या दुर्घटनेतील ११ जणांचा मृत्यू हा एकट्या जयपूरमध्ये झाला आहे.
झालवाड जिल्ह्यातील कंवास पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, गरडा गावात पावसाच्या हजेरीने अनेक जणांना आडोसा घेऊ उभे होते. यावेळी एका झाडाखाली ४ जणांवर कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. राधे बंजारा उर्फ बावला (१२), पुखराज बंजारा (वय १६), विक्रम (१६) आणि त्याचा भाऊ अखराज (१३) अशी मृतांची नावे आहे. तर एक गाय आणि सुमारे १० बकऱ्यांचाही यात मृत्यू झाला आहे.
जखमी राहुल, विक्रम, राकेश, मानसिंह आणि फुलीबाई या तरुणांना उपचारांसाठी रुग्णालयात भर्ती करण्यात आले आहे. याचदरम्यान राजस्थानमधील जहालवार येथील लालगौन येथे शेळ्या चरायला नेणाऱ्या तारासिंग भिल या २३ वर्षीय मुलावरही वीज पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर यात दोन म्हशी दगावल्या आहेत. तर सुनेल पोलीस स्टेशन परिसरातील चाचाना गावात वीज पडून दोन अल्पवयीन मुली जखमी झाल्या आहेत.
धौलपुर जिल्ह्यातील बारी उपविभाग परिसरातील कुदिन्ना गावांत वीज कोसळल्याने दोन सख्ख्या भावांसह एकूण ३ मुलांचा मृत्यू झाला. शेळ्या चरायला नेत असतानाही ही दुर्घटना घडली. लवकुश (१५), विपिन (१०), भोलू (८) अशी मृत पावलेल्या मुलांची नावे आहेत.
राजस्थानमध्ये घडलेल्या या घटनांसंदर्भात मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी ट्विटरवरुन शोक व्यक्त केला आहे. शोक व्यक्त करताना मुख्यमंत्री अशोक गहलोत म्हणाले की, कोटा, धौलपूर, झालावाड़, जयपूर आणि बारामध्ये वीज कोसळल्याने झालेली जीवितहानी अत्यंत दु:खद आणि दुर्दैवी घटना आहे. पीडित कुटुंबियांबद्दल मी संवेदनशीलता व्यक्त करत देव त्यांना हे दु:ख पचवण्याचे सामर्थ्य देऊ. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर केली आहे. जखमींनाही मदत करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.