जगात आणि भारतातील महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने या संकटावर कसा विजय मिळवायचा याबाबत विचारविनिमय सुरू असतानाच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी एक वेगळी सूचना केली आहे की, भारतासह जगातील सर्वच देशांनी आता करोना विषाणूसोबत जगण्याची सवय लावून घ्यावी. देशात दीड महिन्यापासून सर्व व्यवहार बंद असल्याने समाजातील सर्वच घटकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे, अशा प्रकारचे लॉकडाऊन दीर्घकाळ सुरू ठेवणे कोणालाही परवडणारे नाही म्हणूनच भारतासारख्या मोठ्या देशाने तरी किमान करोनासोबत सहजीवनाचा विचार करायला हवा, असे डॉ. कोल्हे यांनी म्हटले आहे.
अमोल कोल्हे एक अभिनेते म्हणून प्रसिद्ध असले तरी ते व्यवसायाने डॉक्टर आहेत म्हणूनच त्यांच्या या सूचनेचा विचार करावा लागणार आहे. डॉ. कोल्हे यांनी म्हटल्याप्रमाणे सध्या आपण अनेक घातक विषाणूंसोबत सहजीवन पार पाडतच आहोत. या विषाणूंमुळे होणारे आजार अधून-मधून समाजाला त्रास देतात. साथीचे रोग पसरतात आणि परत त्यावर मात केली जाते. त्याच प्रकारे आता करोना विषाणूसोबतही जगण्याची सवय लागायला हवी, असे डॉ. कोल्हे यांना म्हणायचे आहे. 20व्या शतकात जगातील अनेक संसर्गजन्य आणि घातक रोगांवर नियंत्रण मिळवण्यात आले असले तरी अनेक नवीन रोग आणि विषाणूही निर्माण झाले आहेत. 20व्या शतकाच्या शेवटच्या 25 वर्षांमध्ये जेव्हा एचआयव्ही म्हणजेच एड्सबाबतच्या विषाणूचा शोध लागला होता तेव्हाही असाच हाहाकार माजला होता. आजही एचआयव्ही जिवंत आहे आणि कार्यरतही आहे. नंतरच्या कालावधीमध्ये सार्स, इबोला, स्वाइन फ्लू, बर्ड फ्लू अशा अनेक आजारांनी जगाला ग्रासले होते.
आज 2020 मध्ये यापैकी कोणत्याही विषाणूंवर संपूर्ण नियंत्रण मिळवण्यात जगातील कोणत्याही सरकारला शक्य झालेले नाही. त्यामुळे अधूनमधून हे आजार डोके वर काढत असतात. याशिवाय मानवी आयुष्याला नेहमीच ग्रासून टाकणारे मलेरिया, न्यूमोनिया, टायफाइड या आजारांचे विषाणूही अधूनमधून साथीचे रोग निर्माण करत असतात. अर्थात, या आजारांवरील लसी आणि औषधे निघाली असल्याने हे आजार आता तेवढे प्राणघातक वाटत नाहीत. तरीही हे आजार आणि हे आजार निर्माण करणारे विषाणू त्यांच्यासोबत मानवाला सहजीवन पार पाडावे लागत आहे. या सर्व बाबींचा विचार करता कोल्हे यांनी केलेली सूचना विचार करण्यासारखी आणि निश्चितच अमलात आणण्यासारखी आहे. करोना विषाणूची लस किंवा त्यावरील औषध याचा शोध कधी लागेल याबाबत सध्या काहीच सांगता येत नाही.
जगातील विविध देशांमध्ये शास्त्रज्ञ त्यासाठी जीवापाड प्रयत्न करत आहेत. ऑक्सफर्डमधील संस्थांमध्ये याबाबत यशस्वी प्रयोग झाल्याचेही सांगण्यात येत आहे. अर्थात जरी लस किंवा औषध यांचा शोध लागला तरी ती प्रत्यक्ष अमलात येण्यास आणि लोकांच्या वापरासाठी उपलब्ध होण्यासाठी किमान सहा महिन्यांचा कालावधी जाणार आहे. तोपर्यंत लॉकडाऊनसारखे निर्णय घेऊन जर सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले तर एक वेगळीच आर्थिक समस्या निर्माण होऊ शकते. खरे तर सध्या कोणतीही लस किंवा औषध उपलब्ध नसतानाही भारतासारख्या देशामध्ये हजारो करोना रुग्ण आपापल्या घरी परतले आहेत. करोनाची बाधा झालेल्या रुग्णांपैकी मरण पावलेल्यांची संख्याही भारतात खूप कमी आहे.
भारतीय नागरिकांची प्रतिकारक्षमता जगातील इतर नागरिकांच्या तुलनेने जास्त असल्याने असे घडत असल्याचे सांगण्यात येत आहे. साहजिकच सरकारने लोकांची प्रतिकारक्षमता अधिक वाढवण्यावर भर दिला तर करोनावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवता येऊ शकते. त्याशिवाय प्लाझ्मा थेरपीचा वापर करूनही या विषाणूमुळे होणाऱ्या आजारावर मात करता येऊ शकते ही गोष्टही समोर येत आहे. जागतिक आरोग्य संघटना किंवा इतर सर्व आरोग्याशी संबंधित संस्थांनी दिलेल्या माहितीप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांना या विषाणूचा जास्त धोका आहे किंवा कोणत्याही आजाराने ग्रस्त असलेल्या माणसाची प्रतिकारक्षमता कमी असल्याने अशा माणसांनाही धोका जास्त आहे. साहजिकच ज्या लोकांना या विषाणूचा जास्त धोका आहे त्यांच्यावर लक्ष केंद्रित करून बाकी समाज घटकांना त्यांच्या दैनंदिन व्यवहार नियमित पार पाळण्याची मुभा देणे हाच या सहजीवनाचा अर्थ आहे. कोल्हे यांनी म्हटल्याप्रमाणे लॉकडाऊन म्हणजे सर्व व्यवहार दीर्घकाळ बंद ठेवणे कोणालाच परवडणारे नाही. दीड महिन्याच्या लॉकडाऊननंतरच आर्थिक घडी किती विस्कटली आहे त्या गंभीर बाबी समोर येत आहेत. उद्योगधंदे बंद असल्यामुळे बेरोजगारी वाढली आहे. व्यापार बंद असल्यामुळे कोट्यवधीची उलाढाल ठप्प झाली आहे.
मानवी आयुष्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा बंद असल्याने सर्व गाडा ठप्प झाला आहे. दीड महिन्याच्या बंद व्यवहारानंतरच समाजमनाची अस्वस्थता वाढत चालली आहे. भविष्याबद्दल चिंता अनेकांना सतावत आहे. आता 3 मे नंतर आणखी काही कालावधीसाठी लॉकडाऊन वाढवला जाईल अशी शंकाही व्यक्त होत आहे. तसे झाले तर समाजातील अस्वस्थता आणि मानसिक वैफल्यग्रस्तता अधिकच वाढत जाईल म्हणूनच कोल्हे यांच्यासारख्या वैद्यकीय तज्ज्ञांनी केलेली सूचना विचारात घ्यायला हवी. वैद्यकीय क्षेत्रामध्ये नेहमीच “प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर’ ही म्हण वापरली जाते, पण अशा प्रकारच्या प्रिव्हेन्शनसाठी फक्त लॉकडाऊन ही एकच गोष्ट उपलब्ध नाही. लोकांची प्रतिकारक्षमता वाढवतानाच योग्य काळजी घेण्यात आली तर करोनाच्या प्रसारावर निश्चितच नियंत्रण बसू शकते.
जगातील अनेक वैद्यकीय तज्ज्ञांनी म्हटल्याप्रमाणे नजीकच्या काळात या विषयांवर जरी नियंत्रण मिळवण्यात यश आले किंवा या विषयांवरील लस आणि औषधाचा शोध लागला तरी हा विषाणू अधूनमधून मानवी जीवनाला त्रास देणारच आहे. म्हणूनच या विषाणूसोबत सहजीवनाची सवय आता लावून घ्यायला हवी या विधानामध्ये तथ्य आहे. लॉकडाऊनसारखे निर्णय घेऊन दीर्घकाळ सर्व व्यवहार बंद ठेवणे भारतासारख्या अर्थव्यवस्थेला परवडणारे नाही असेच या विधानातून कोल्हे यांना म्हणायचे आहे. जगायचे असेल तर करोना विषाणूसोबतचे सहजीवनही आता स्वीकारावे लागणार आहे, हाच याचा अर्थ.