सातारा – पुण्यातील कुख्यात गुंड गजानन मारणे याला सातारा जिल्ह्यात आश्रय देणाऱ्या व मदत करणाऱ्यांची चौकशी करून, कडक कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. म्हसवड येथील अपहरण प्रकरणातही दोषी असलेल्या प्रत्येकाची चौकशी करून पोलीस कारवाई करतील, असेही देसाई यांनी सांगितले.
गजा मारणेला पकडल्याबद्दल मेढ्याचे सपोनि अमोल माने, हवालदार जितेंद्र कांबळे, इम्रान मेटकरी व अमोल पवार यांचा देसाई यांच्या हस्ते सोमवारी सत्कार करण्यात आला. पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, उपअधीक्षक (गृह) राजेंद्र साळुंखे व अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर देसाई यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, जिल्ह्यातील पोलीस जिगरबाज असून गृह राज्यमंत्री म्हणून मला त्यांचा अभिमान आहे.
पुण्याचा कुख्यात गुंड गजा मारणेचा आपल्या पोलिसांनी पाठलाग केला. त्याच्याकडे शस्त्र असते आणि त्याला पकडताना त्याने पोलिसांवर गोळीबार केला असता तर मोठी आपत्ती ओढवली असती. त्यामुळे या जिगरबाज पोलिसांचा योग्य सन्मान केला जाईल. नगर जिल्ह्यातील एका प्रकरणात संशयिताला आश्रय देणाऱ्या अनेकांना पोलिसांनी सहाआरोपी केले आहे. त्याचप्रमाणे गजा मारणेला मदत करणाऱ्यांवर कारवाई करणार का, या प्रश्नावर ना. देसाई म्हणाले,
गुंड गजा मारणे जिल्ह्यात कुठे राहिला, त्याला कोणी मदत केली, याचा तपास पोलीस करतील. त्याचा एक मोबाइल पोलिसांच्या ताब्यात असून त्याद्वारे इतरांची माहिती घेऊन चौकशीअंती गुन्हे दाखल केले जातील. म्हसवड येथील डॉ. नानासाहेब शिंदे यांच्या अपहरणाबाबत विचारले असता, त्या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर पोलीस कारवाई करतील. यामध्ये पोलीस दलावर आपला दबाव नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सचिन वाझे प्रकरणात काही प्रशासकीय अधिकारी सरकारविरोधात भूमिका घेत आहेत.
सरकारला अडचणीत आणण्यासाठी विरोधी गटास माहिती पुरवत असल्याची चर्चा आहे. याबाबतच्या प्रश्नावर ना. देसाई म्हणाले, महाराष्ट्र एटीएस देशात नावाजलेली तपास यंत्रणा आहे. या यंत्रणेने अनेक धागेदोरे मिळवून तपास केला होता. त्यांचा तपास सुरू असतानाच केंद्रीय तपास यंत्रणेने तो आपल्या हाती घेतला. एनआयए सध्या तपास करत आहे. अंबानींच्या बंगल्याबाहेरील गाडीत सापडलेली स्फोटके नागपूर येथील एका कंपनीची आहे.
ती कंपनी भाजपच्या मातृसंस्थेच्या जवळिकीतील आहे, असे विचारले असता देसाई म्हणाले, त्याचाही तपास केंद्रीय यंत्रणाच करेल. वाझे प्रकरणात आक्रमक विरोधकांमुळे सरकार बॅकफूटवर गेले आहे का, या प्रश्नावर देसाई यांनी नकारार्थी उत्तर दिले. तसे काही झालेले नाही. सरकारचा तपास योग्य आहे. कोणालाही पाठीशी घालण्यात येत नसल्याचे ते म्हणाले.