दखल : जयेश राणे
विदेशाचे आकर्षण असणाऱ्या भारतीय नागरिकांनी प्रथम भारत पाहावा तद्नंतर विदेश पाहता येईल. किंबहुना अत्यंत आत्मियतेने ही भूमी पाहिल्यास विदेश पाहण्याचा विचार आपसूकच मनातून कधी पुसला गेला, हे कळणारही नाही.
भारतात अनेक पर्यटन स्थळे आहेत. त्या ठिकाणी जाण्यासाठी विविध प्रवासी आस्थापने आहेत. सुट्टीच्या कालावधीत पर्यटनस्थळी भेट देणाऱ्या नागरिकांची संख्या अधिक असते. निसर्गरम्य, ऐतिहासिक, धार्मिक आदी स्थळांची पर्यटन स्थळे म्हणून विभागणी झाली आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे दोन्ही जिल्हे भारतामध्ये पर्यटनात प्रथम स्थानी राहिले आहेत.
यावरून कोकणातील पर्यटन राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर किती महत्त्वाचे आणि दखलपात्र आहे, हे लक्षात येते. एक गोष्ट कायम लक्षात असू द्यावी की, जे भारतामध्ये आहे ते जगामध्ये कुठेच नाही. हे विदेशी लोकांना उत्तमप्रकारे माहीत आहे. यासाठीच ते पर्यटनाच्या निमित्ताने अभ्यास करण्यासाठी येथे भेट देतात. अभ्यासपूर्ण पर्यटन कसे करावे हे त्यांच्याकडूनच शिकता येते. केवळ सेल्फी काढणे, ग्रुप फोटो काढणे, खाण्याकडे लक्ष असणे म्हणजे पर्यटन नाही. याला केवळ हौशागौशांची पिकनिक म्हणता येईल. त्यामुळे हौशेगौशे न बनता अभ्यासू पर्यटक बनूया!
पर्यटन स्थळांना पिकनिक म्हणून भेट न देता त्या सूत्राकडे शिकण्याच्या दृष्टीने पाहिले पाहिजे. अन्यथा केवळ त्या ठिकाणी भेट दिल्याप्रमाणे होईल. पर्यटनासाठी घसघशीत रक्कम मोजणारे पर्यटनप्रेमी नागरिक देशात बहुसंख्येने आहेत. आर्थिक स्थितीमुळे सर्वांनाच पर्यटनस्थळी जाता येत नाही; मात्र ज्यांना जाणे शक्य होते त्यांनी तेथील ऐतिहासिक, धार्मिक स्थळांची अभ्यासपूर्ण माहिती इतरांना दिली पाहिजे. भारतातच पाहण्यासारख्या एवढ्या गोष्टी आहेत की त्या पाहून मंत्रमुग्ध झाल्याने विदेशातील पर्यटनस्थळे पाहण्याची इच्छा होणार नाही.
भारत न पाहता जेव्हा विदेशगमन केले जाते, तेव्हा अर्थातच विदेशच श्रेष्ठ वाटणार; मात्र जेव्हा भारत पाहून विदेशाकडे कूच केले जाईल त्या वेळी मात्र स्वतःच्या देशाविषयी त्यांना भरभरून सांगता येईल. त्यामुळे त्यांच्यात नक्कीच भारताविषयी आकर्षक निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही; कारण एखादी गोष्ट जेव्हा अत्यंत पोटतिडकीने सांगितली जाते, तेव्हा नक्कीच समोरील व्यक्तीच्या मनात त्याविषयी आवड निर्माण होऊ लागते. आजमितीस अशी स्थिती आहे की, अनेक विदेशी नागरिकांना भारताचे आकर्षण आहे. ते येथील धार्मिक, ऐतिहासिक स्थळांना पर्यटन म्हणून भेट देत नाहीत, तर येथील प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करत असतात.
काही नागरिक पर्यटनस्थळी मद्याच्या बाटल्या, सिगारेट, तसेच खाद्यपदार्थांची पाकिटे, पाण्याच्या रिकाम्या बाटल्या आदी कचरा फेकून देतात. त्यामुळे ते स्थळ अस्वच्छ दिसते. स्वच्छता करण्यास हातभार लावण्यासाठी नाक मुरडणारी मंडळी ते कुठेही असतील तेथील परिसर अस्वच्छ करत असतात; कारण त्यांना कायमच स्वच्छतेचे वावडे असते. स्वच्छता हा पर्यटनातील महत्त्वाचा गाभा आहे. त्यालाच छेद देणारी माणसे म्हणजे पर्यटन क्षेत्राचे शत्रूच म्हणता येतील. आपणच आपल्या पर्यटन स्थळांचे महत्त्व अशा प्रकारे न्यून करत असतो. पर्यटनाच्या माध्यमातून देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी मिळू शकते, हे सूत्र विदेशांनी अचूकपणे हेरले आहे.
स्वित्झर्लंड भारताच्या भौगोलिक तुलनेत पुष्कळ लहान देश आहे. मात्र, त्यांनी जे निसर्गसौंदर्य टिकवून ठेवले आहे. त्याकडे संपूर्ण जग आकर्षित होते. अनेकांना तेथील पर्यटन करण्याची इच्छा असते. यावरूनच लक्षात येते की, त्यांनी निसर्गाने दिलेल्या गोष्टींची किती काळजी घेतली आहे. यामध्ये तेथील सरकारसह नागरिकही आघाडीवर आहेत. नागरिकांनीही आपली कर्तव्ये पार पाडली की अनेक गोष्टी सुलभ होतात.
भारत त्यात पुष्कळच मागे पडला आहे. भारतात पाहण्यासारखे पुष्कळ आहे; पण त्या स्थळापर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक व्यवस्था, सुरक्षा या प्रमुख सूत्रांविषयी प्रश्नचिन्ह आहे.प्रत्येक ठिकाणी कोणती धार्मिक, ऐतिहासिक स्थळे आहेत. यांची सूची प्रत्येक सार्वजनिक प्रवासी वाहतूक ठिकाणी असणे आवश्यक आहे. त्यामुळे अनायसे त्यामार्गे जाणाऱ्या नागरिकांनाही कळते की या ठिकाणी अमुक अशी स्थळे आहेत. काही धार्मिक ठिकाणी अनैतिक गोष्टींनी पाय पसरले आहेत.
अशी ठिकाणे म्हणजे पर्यटन स्थळे नाहीत, हे लक्षात घेऊन तेथील पावित्र्य टिकवले पाहिजे. धार्मिक, ऐतिहासिक स्थळांना पिकनिक स्पॉट बनवू नये. यामुळे जी मंडळी त्या ठिकाणी भेट देण्यासाठी ज्या भावाने आलेली असतात त्यांच्या आनंदात मिठाचा खडा टाकणेच आहे. उत्तम पर्यटक तोच म्हणता येईल जो आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही, याचा विचार करतो आणि ज्या ठिकाणी भेट देत आहोत त्याचा अभ्यासही करतो.