माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे आवाहन
पुणे – विधानसभेची आगामी निवडणूक गेल्या पाच वर्षांतील सरकारचा कारभार, भ्रष्टाचार, चुकीची आर्थिक धोरणे, विकास यापेक्षाही कॉंग्रेसच्या गावोगावच्या बूथ कार्यकर्त्यांसाठी ही वैचारिक लढाई आहे. बूथ कार्यकर्त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देऊन प्रशिक्षित करून त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी या “निर्धार’ कार्यशाळेचे आयोजन केले आहे. निवडणूक व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घेऊन आगामी निवडणूक बूथवर लढवू, असे आवाहन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी केले.
महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या वतीने राज्यातील प्रत्येक विभागातील निवडक कार्यकर्त्यांसाठी “निर्धार’ या दोन दिवसांच्या कार्यशाळेचे आयोजन पुण्यात केले आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन चव्हण यांच्या हस्ते झाले. अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे चिटणीस आणि प्रशिक्षण विभागाचे प्रमुख सचिन राव, अन्य राष्ट्रीय चिटणीस आणि महाराष्ट्राचे सहप्रभारी वांशी रेड्डी, संपतकुमार, आशिष दुआ, बी. एम. संदीप, प्रदेश सरचिटणीस आणि प्रशिक्षण विभागाचे समन्वयक अभय छाजेड यावेळी उपस्थित होते.
सध्या सत्तेचा नंगा नाच सुरू आहे. लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम सुरू आहे. कॉंग्रेस पक्षाचा कणा असलेली सहकार चळवळ मोडीत काढण्यात येत आहे. निवडणुकीत हे सर्व मुद्दे असतीलच; पण ते बूथ कार्यकर्त्यांलाही मतदारांच्या घरी जाऊन त्यांना सांगता येणे गरजेचे आहे.
कारण ही निर्णायक लढाई असून, समाजाच्या भवितव्यासाठीच्या या लढाईतील शिलेदार म्हणून या वर्गातील प्रशिक्षणार्थींची निवड झाली आहे. कॉंग्रेसचा अनपेक्षित पराभव झाला असला, तरी आजही पक्षासाठी समर्पितपणे काम करणारा कार्यकर्ता प्रत्येक गावात आहे. त्यांच्याशी संपर्क करणे, बैठका घेणे, त्यांना लागणाऱ्या प्राथमिक गोष्टींची पूर्तता करणे, योग्य सूचना देणे किंवा त्यांच्याकडचे अनुभव जाणून घेणे अशी कामे या वर्गातील प्रशिक्षित कार्यकर्त्यांना करायची आहे, असे राव यांनी सांगितले. रेड्डी, छाजेड यांचीही भाषणे झाली.