पुणे – विधानसभा निवडणूक जवळ आली आहे. वेळ कमी असून कार्यकर्त्यांनी गटबाजी विसरून कामाला लागावे. ज्याचे माप त्याच्या पदरात टाकले जाणार आहे. ज्यांना जायचे आहे, त्यांना जाऊ द्या, नव्यांना संधी मिळेल. कार्यकर्त्यांनो, आत्मविश्वास ढळू देऊ नका, असे आवाहन कॉंग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केले.
पुणे शहर, पुणे जिल्हा, पिंपरी-चिंचवड, सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर या जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीस इच्छुक असणाऱ्या उमेदवारांशी थोरात यांनी कॉंग्रेसभवन येथे संवाद साधला. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रभारी सोनम पटेल, माजी मंत्री हर्षवधन पाटील, यशोमती ठाकूर, आमदार विश्वजीत कदम, माजी खासदार व कार्याध्यक्ष मुझफ्फर हुसेन, युवक कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे, माजी आमदार मोहन जोशी, शरद रणपिसे, शहराध्यक्ष रमेश बागवे यावेळी उपस्थित होते. थोरात म्हणाले, “पक्ष कधी संपत नाही. यापूर्वीही पक्षाला वाईट दिवस आले होते. कार्यकर्त्यांनी मागचे काढत बसू नये. मागचे काढत बसलात तर विषय संपणार नाही. कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मरगळ झटकून कामाला लागावे.