वाई – दोन वेळा समोरच्या उमेदवाराला आपण सर्वांनी चारीमुंड्या चित केलं आहे. आताही तोच उमेदवार आहे, फक्त कव्हर बदललं असून स्वतःच्या स्वार्थासाठी विचार, तत्व, निष्ठा बदलणाऱ्या या उमेदवाराला आता आपण कायमचं घरी बसवूया. दोन्ही निवडणुकांसारखी याही वेळी अर्ज भरताना अभूतपूर्व गर्दी करून राष्ट्रवादीच्या विजयाचा झेंडा फडकवूया, असे आवाहन आमदार मकरंद पाटील यांनी केले. वाई येथे आयोजित मेळाव्यात ते बोलत होते.
यावेळी प्रदेश चिटणीस प्रताप पवार, बाळासाहेब भिलारे, दत्तानाना ढमाळ, पाचगणीचे माजी नगराध्यक्ष नानासाहेब कासुर्डे, शशिकांत पिसाळ, दिलीप पिसाळ, जि. प. कृषी सभापती मनोज पवार, उपसभापती अनिल जगताप, महाबळेश्वर तालुकाध्यक्ष महादेव शेलार, खंडाळा पंचायत समितीचे सभापती मकरंद मोटे, वाई तालुकाध्यक्ष विक्रांत डोंगरे, उपनगराध्यक्ष अनिल सावंत, शेखर कासुर्डे, प्रमोद शिंदे, महादेव मसकर, मदन भोसले, शशिकांत पवार, उपसरंपच तानाजी कचरे, संजूबाबा गायकवाड, राजेंद्र राजपुरे, जि.प. सदस्य मधुकर चव्हाण, उदय कबुले, मोहन जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
आ. पाटील म्हणाले, आज सर्वत्र इकडून तिकडे उड्या मारण्याचे उद्योग सुरू आहेत. आपल्या कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल सुरू झाली होती, मात्र गेल्या पंधरा-वीस दिवसात महाराष्ट्रातील चित्र पूर्णतः बदलले आहे.
शरद पवार साहेबांसारख्या 80 वर्षांच्या तरूणाने पुन्हा एकदा चमत्कार करून दाखवला आहे. उद्याची निवडणूक केवळ मकरंद पाटील यांच्यासाठी महत्त्वाची नसून ती समाजातील प्रत्येक घटकासाठी महत्त्वाची आहे. समोरचा उमेदवार तोच आहे, फक्त कव्हर बदललं आहे. यावेळी हे पार्सल घरपोच करायचं आहे त्यासाठी सर्वांनी कंबर कसून सज्ज रहा असे आवाहन आ. पाटील यांनी केले.
यावेळी बाळासाहेब भिलारे, दिलीप पिसाळ, शशिकांत पिसाळ, दत्तानाना ढमाळ यांच्यासह नगरसेवक भारत खामकर, महाबळेश्वरचे तालुकाध्यक्ष महादेव शेलार, विजयसिंह पिसाळ, सचिन इथापे, गणेश धायगुडे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रदेश चिटणीस प्रताप पवार यांनी प्रास्तविक केले. शशिकांत पवार यांनी आभार मानले.