मुंबई : क्रुज ड्रग्ज प्रकरणात एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर एनसीबीचे पंच प्रभाकर साईल यांनी केलेल्या आरोपांमुळे या प्रकरणाला नवीन वळण मिळालं आहे. भाजपकडून सातत्याने समीर वानखेडेंची पाठराखण करण्यात येत होती. मात्र आता किरीट सोमय्यांनी केलेल्या विधानामुळे भाजप आर्यन प्रकरणावरून माघार घेत असल्याचं चित्र आहे.
किरीट सोमय्या यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच त्यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांकडे आपला मोर्चा वळवला. याआधी सोमय्या यांनीच इशारा दिला होता की, समीर वानखेडेंच्या केसाला जरी धक्का लागला तरी, महाराष्ट्र पेटून उठेल.
ठाकरे सरकारची माफीयागिरीची पद्धत सिद्ध झाली आहे. परमवीर सिंह यांनी ठाकरे सरकारवार आरोप केले. त्यानंतर त्यांच्याविरोधातही तक्रारी दाखल केल्या. आता समीर वानखेडेंमागे सरकार खुनशीपणाने लागले आहेत.
दरम्यान समीर वानखेडेंनी बोगस जातीचं प्रमाणपत्र दाखल करून नोकरी मिळवल्याच्या आरोपावर सोमय्या यांना विचारण्यात आले. त्यावर ते म्हणाले हे प्रकरण कोर्टात आहे. २३ नेत्यांवरच्या घोटाळ्यांवरच लक्ष विचलित करण्यासाठी ठाकरे सरकारने आर्यन प्रकरण पुढं केल्याचा दावा सोमय्या यांनी केला.
सोमय्या पुढे म्हणाले की, समीर वानखेडेंनी काय चुक केली असेल आर्यनने काय केलं असेल ते होऊद्या, पण ठाकरे सरकारमधील घोटाळेबाज नेत्यांवर कारवाई होणारच, असा दावाही सोमय्या यांनी केला.