संगमनेर (प्रतिनिधी) – तालुक्यातील पिंप्री- लौकी अजामपूर येथील लक्ष्मण किसन गिते यांच्या वस्तीवर बिबट्याने सोमवारी रात्री सात शेळ्यांवर हल्ला केला. या हल्ल्यात चार शेळ्या ठार झाल्या असून, तीन जखमी झाल्या आहेत. यातील एक शेळी घेऊन बिबट्याने पलायन केले आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, पिंप्री- लौकी येथील लक्ष्मण किसन गिते यांचा जनावरांचा गोठा आहे. सोमवारी रात्री गिते कुटुंबिय गाढ झोपेत असताना बिबट्याने पाण्याच्या टाकीचा आधार घेत गोठ्यात प्रवेश केला व गोठ्यातील सात शेळ्यांवर हल्ला केला. त्यामुळे तीन शेळ्या ठार व तीन शेळ्या गंभीर जखमी झाल्या. यावेळी बिबट्याने एक शेळी घेऊन पलायन केले.
दरम्यान, मंगळवारी सकाळी गिते कुटुंबीय गोठ्यात गेल्यानंतर घडलेला प्रकार लक्षात आला. त्यामुळे गिते यांनी वनविभागाला माहिती दिली. माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत घटनेचा पंचनामा केला.
यामध्ये मृत तीन शेळ्यांचा पंचनामा करण्यात आला असून, यावेळी डॉ. शिंदे, वनपाल उपासनी, एस. बी. सोनवणे व चौधरी आदींसह शेतकरी लक्ष्मण गिते उपस्थित होते.