मुंबई – स्वराज्यजननी, राजमाता जिजाऊ मॉंसाहेबांच्या प्रेरणेतूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. मॉंसाहेबांनी महाराष्ट्राला स्वाभिमान शिकवला, राष्ट्रासाठी त्यागाची आणि जगण्याची प्रेरणा दिली. कुठल्याही संकटावर मात करण्याचे बळ दिले.
जिजाऊ मॉंसाहेबांच्या स्वाभिमानी विचारांवरच आजही महाराष्ट्राची वाटचाल सुरु आहे. प्रत्येक आव्हानावर मात करण्याचे बळ मॉंसाहेबांच्या संस्कारी विचारातच आहे, अशा शब्दात राजमाता जिजाऊ मॉंसाहेबांचे स्मरण करुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना जयंती निमित्त अभिवादन केले आहे.
राजमाता जिजाऊ मॉंसाहेबांच्या जयंतीनिमित्त कृतज्ञतापूर्वक वंदन करुन उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, शेकडो वर्षांच्या गुलामगिरीच्या जोखडातून मुक्ततेची वाट राजमाता मॉं जिजाऊंनी महाराष्ट्राला दाखविली. त्यांच्या प्रेरणेतूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राच्या भूमीत शेतकऱ्यांचे-रयतेचे स्वराज्य स्थापन केले.
मॉंसाहेबांच्या ज्या विचारांनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवले, हजारो मावळ्यांना प्रेरणा दिली, त्याच विचारांवर आजही महाराष्ट्राची वाटचाल सुरु आहे. जिजाऊ मॉंसाहेबांचे विचार, संस्कार आपल्याला कायमच लढण्याची प्रेरणा आणि बळ देत राहतील.
राजमाता जिजाऊ मॉंसाहेबांनी मोठ्या शौर्याने, ध्यैर्याने, संयमाने स्वराज्याचे स्वप्न साकार केले. शेती, शिक्षण, सहकार, सामाजिक सुधारणा अशा अनेक क्षेत्रात आपला महाराष्ट्र आज आघाडीवर दिसतो, याचे मूळ जिजाऊ मॉंसाहेबांनी रुजविलेल्या स्वाभिमानाच्या विचारात आणि राष्ट्रासाठी त्यागाच्या संस्कारात आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.