पुणे – राज्यात लातूर, परभणी आणि बीड या ठिकाणी “बर्ड फ्लू’मुळे कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचे भोपाळस्थित “राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थे’च्या तपासणी अहवालातून स्पष्ट झाले आहे. असे असले तरी अंडी आणि चिकन 70 अंश सेंटिग्रेड तापमानावर 30 मिनिटे शिजवून खाल्यास विषाणू निष्क्रिय होत असून, ते खाणे पूर्णपणे सुरक्षित आहे, असा निर्वाळा राज्याचे पशुसंवर्धन आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिला.
हिमाचल प्रदेश, राजस्थान, केरळ, मध्य प्रदेश पाठोपाठ राज्यातही “बर्ड फ्लू’चा प्रादुर्भाव आढळून आला आहे. त्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन आयुक्त कार्यालयातर्फे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. धनंजय परकाळे, सहआयुक्त डॉ. विनायक लिमये आदी उपस्थित होते.
राज्यात गेल्या 24 तासांत यवतमाळ, अमरावती, अकोला जिल्ह्यांत 214 कोंबड्या आणि 4 कावळ्यांचा मृत्यू झाला आहे. या सर्व पक्ष्यांचे नमुने तपासणीसाठी भोपाळ आणि पुण्यातील प्रयोगशाळेत पाठवले असून, तपासणीचे निष्कर्ष हाती येण्यास दोन ते तीन दिवस लागणार आहेत, असेही सिंह यांनी नमूद केले.
कोंबड्या नष्ट करण्याची कार्यवाही सुरू
आठ जानेवारीपासून आतापर्यंत 1,839 विविध पक्ष्यांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यांचे नमुने प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवले आहेत. त्यापैकी परभणी जिल्ह्यातील मुरुंबा (हायली पॅथोजेनिक एव्हियन एन्फ्लूएन्झा – एच 5 एन 1 स्ट्रेन) आणि लातूरमधील अहमदपूर तालुक्यातील केंद्रेवाडी येथील पोल्ट्री फार्ममधील नमुनेही पॉझिटिव्ह आल्याने आजूबाजूचा 10 किमी परिसर संसर्गग्रस्त क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. या पोल्ट्री फार्मपासून एक किमी त्रिज्येतील सर्व कोंबड्या नष्ट करण्याची कार्यवाही सुरू केली आहे, असे सिंह म्हणाले.
बर्ड फ्लूचा भारतात एकही रुग्ण नाही
गेल्या 20 ते 25 वर्षांत जगभरात 845 जणांना बर्ड फ्लूचा संसर्ग झाल्याचे आढळून आले असून, यापैकी 541 जणांचा मृत्यू झाला आहे. भारतात 2006 मध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव आढळून आला असून, अद्याप एकाही भारतीयाला या आजाराचा संसर्ग अथवा मृत्यू झाल्याचे आढळून आले नाही, असेही पशुसवंर्धन आयुक्तांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्लूएचओ) आकडेवारीच्या हवाल्याने सांगितले. चिकन विक्रेत्यांनी मास्क, हॅंड ग्लोव्होज, ऍप्रन वापरावे, असे आवाहनही त्यांनी केले.
मृत पक्षी आढळ्यास संपर्क करण्याचे आवाहन
कावळे, पोपट, बगळे, स्थलांतरित पक्ष्यांचा मृत्यू झाल्याचे आढळल्यास किंवा व्यावसायिक पोल्ट्री फार्ममध्ये कोंबड्यांचे मृत्यू नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात होत असल्याचे आढळल्यास जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात माहिती द्या किंवा पशुसंवर्धन आयुक्तालयाच्या 18002330418 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधा. मृत पक्षांना हात लावू नका किंवा त्यांची परस्पर विल्हेवाट लावू नका.