कोंबड्यांना नुकसान भरपाई देण्याची तरतूद नाही
टाकळी हाजी – जांबूत (ता. शिरूर) येथील बागायतदार बाळासाहेब हरिभाऊ पठारे यांच्या कुक्कुट पालनावर बिबट्याने हल्ला करीत रात्रीत ऐंशी कोंबड्यांचा फडशा पाडला. या भागातील बिबट्याच्या दहशतीने धुमाकूळ घातला असून नागरिकांमध्ये पुन्हा दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जांबूत, पिंपरखेड परिसरात ऊसक्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्याने पाच सहा वर्षांपासून या भागात बिबट्याचे वास्तव्य आहे. यापूर्वी बिबट्याने अनेक शेळ्या मेंढ्या तसेच मोठ्या जनावरांवर हल्ला केला असून मानवी हल्ले देखिल केले आहे. त्यामुळे या भागात बिबट्याच्या दहशतीमुळे शाळकरी विद्यार्थी, महिला तसेच नागरिकांमध्ये भीतीचे मोठे वातावरण आहे. शुक्रवारी मध्यरात्री बाळासाहेब पठारे यांच्या खुराड्यात बिबट्याने प्रवेश करुन ऐंशी कोंबड्या फस्त केल्या. याची खबर पठारे यांना शनिवारी सकाळी लागली त्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना संपर्क केला; परंतु कोंबड्यांना नुकसान भरपाई देण्याची तरतूद शासनस्तरावर नसल्याचे त्यांनी सांगितल्याचे पठारे यांनी सांगितले. तरी संबंधित विभागाने या घटनेचा पंचनामा करुन पठारे यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी जांबूत ग्रामस्थांनी केली आहे.