पालखीच्या तोंडावर घटना घडल्याने खळबळ ः हजारो मासे मृत्युमुखी
देहूगाव – संत तुकाराम महाराज पालखी सोहळा 15 दिवसांवर येऊन ठेपला आहे. प्रशासनाकडून सोहळ्याची लगबग सुरू असतानाच इंद्रायणी नदीपात्रातील माशांच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. श्री क्षेत्र देहूगाव येथील पवित्र इंद्रायणीच्या पात्रात किनाऱ्यावर अज्ञात कारणाने रविवारी (दि. 9) मृत मासे आढळले. जलप्रदूषण हे माशांच्या मृत्यूचे प्रमुख कारण असावे, असे प्रथमदर्शनी दिसत आहे. इंद्रायणी नदीमध्ये मागील तीन दशकांतील ही तिसरी मोठी घटना मानली जाते. गेल्या काही काळात नदीपात्रात प्रयत्नपूर्वक वाढविलेल्या महाशीर (देवमासा-खवले मासे) माशांच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
क्षेत्र देहूगाव येथील इंद्रायणी नदीपात्रात फ्रेन्डस् ऑफ नेचर या संस्थेने 2011 ते 2015 महाशीर माशांचे बीज सोडून हे मासे प्रयत्नपूर्वक वाढविले होते. हेच मासे तीर्थक्षेत्र देहूचे वैभव आणि आलेल्या भाविकांचे आकर्षण देखील होते. माशांच्या मृत्यूमुळे हेच वैभव हरपले जाणार आहे. श्री क्षेत्र देहूगाव येथे इंद्रायणी नदीतील नादुरूस्त बंधाऱ्यातून मोठ्या प्रमाणात होणारी पाण्याची गळती, नदी पडलेला राडारोडा यामुळे पात्रातील पाण्याची पातळी खालवलेली आहे. त्यामध्ये नदी काठावरील गावांचे आणि देहूगाव परिसरातील सांडपाणी कोणत्याही प्रक्रियेविना शिवाय थेट इंद्रायणी नदीपात्रात सोडले जात आहे.तसेच इंद्रायणीत जलपर्णी वाढत आहे.
तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील गेल्या दोन वर्षांपासून सांडपाणी प्रक्रिया (एसटीपी/मलनि:सारण योजना) प्रकल्प तयार झालेला असून, मलनि:सारण वाहिन्याही टाकण्यात आल्या आहेत. सध्या ठिकठिकाणी या वाहिन्या जोडण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. तर घरातील मैलापाणी जोडण्यास अद्याप सुरुवात करण्यात आलेली नाही. हाच प्रकल्प वेळेत पूर्ण झाला असता, तर या माशांचा जीव निश्चितपणे वाचला असता अशी वारकरी आणि ग्रामस्थांमध्ये चर्चा आहे. गावातील श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष मधुकर महाराज मोरे, विश्वस्त संजय महाराज मोरे व इंद्रायणी नदी स्वच्छता अभियानात काम करणारे सोमनाथ मुसुडगे, महाशीर मॅन शशांक ओगले, पोलीस पाटील चंद्रशेखर टिळेकर आदींनी मृत माशांची पाहणी केली.
रामराव पाटील, विक्रम नाईक, प्रमोद फुलपगार यासह रानजाई संस्थेतील सुमारे 45 कार्यकर्ते नदी पात्रातील मृत मासे काढण्यासाठी सरसावले होते. मध्यभागातील मृत मासे काढण्यासाठी गजराज बोटिंगचे मालक गजानन काळोखे यासह त्यांचे कर्मचारी यांनी बोटीचे सहकार्य केले. भविष्यातील पुनरावृत्ती टाळण्यासाठी माशांच्या मृत्युचे निश्चित कारणाचा शोध घेण्यात यावा, तसेच जलप्रदूषण रोखणे, नादुरूस्त बंधारा दुरुस्त करणे, नदीपात्रातील जलपर्णी व राडारोडा काढण्याकडे प्रशासनाने त्वरित लक्ष द्यावे, अशी मागणी देहू ग्रामस्थांनी केली आहे. दरम्यान, सायंकाळी साडेसात वाजता माशांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. तसेच सोमवारी (दि. 10) दुपारपर्यंत देहूगाव बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.
देहू इंद्रायणी नदीपात्रात अचानक अज्ञात कारणाने हजारो मासे मृत्युमुखी पडले आहेत, नदीतील पाण्याचे व मृत मासांचे नमुने तपासणीस प्रयोगशाळेत पाठवले आहेत. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचा अहवाल येईपर्यंत कृपया कोणीही हे मासे खाऊ नये. तसेच या मृत माशांची विक्री करू नये, हे पाणी पिऊ नये अथवा या पाण्यात अंघोळ करू नये. अनावधानाने वरील प्रकार घडल्यास किंवा त्यामुळे त्वचा रोग, उलटी, मळमळ, विषबाधेची लक्षणे होऊ शकते. अशी लक्षणे आढळल्यास तत्काळ प्राथमिक आरोग्य केंद्र देहूगाव येथे उपचार व वैद्यकीय अधिकारी यांचा सल्ला घ्यावा.
– डॉ. किशोर यादव, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, देहूगाव
रासायनिक मिश्रित दूषित पाणी, सांडपाणी, वाढते जलपर्णी, शेवाळ यामुळे नद्या “गटारगंगा’ होत आहे. देहू इंद्रायणीतील पाणी हे याच कारणांनी दूषित होत आहे. दूषित झालेल्या पाण्यातील ऑक्सिजन (प्राणवायू) संपुष्टात आल्याने माशांचा मृत्यू होतोय. नदीपात्रातील पाणी अशुद्ध होणार नाही, याकरिता स्थानिक प्रशासनाबरोबरच नदी काठावरील नागरिकांनी आणि ग्रामस्थांनी दखल द्यावी.
– शशांक ओगले. महाशीर मॅन, महाशीर संवर्धन प्रकल्प, तळेगाव दाभाडे.