– विजय लाड
कोयनानगर – पश्चिम घाटावर साकारलेल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात नवजा वनपरिक्षेत्रात येणाऱ्या नवजा नियतक्षेत्रात रामबाण याठिकाणी बिबट्या मृतावस्थेत आढळला आहे. दरम्यान या बिबट्याचा मृत्यू अपघातामुळे की घातपातामुळे झाला आहे याबाबत प्रश्नचिन्ह आहे. या बिबटयाचा मृत्यू अतिवयोमानाने व भटकंतीमुळे आकस्मित झाला असल्याचा दावा वन्यजीव विभागाने केला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की वन्यप्राण्यांचे आश्रयस्थान घनदाट जंगल असणाऱ्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात नवजा नियतक्षेत्रात रामबाण तीर्थक्षेत्राशेजारी असणाऱ्या निर्मनुष्य रस्त्यावर बिबट्या तीन दिवसांपूर्वी २२ डिसेंबर रोजी मृतावस्थेत वन्यजीव विभागाच्या आधिकारी वर्गाला दिसून आला.
यामुळे खळबळ माजली असून या बिबट्याचा मृत्यू अतिवयोमानाने झाला असल्याचे प्राथमिक अनुमान वन्य जीव विभागाने पशुधन विकास आधिकारी पाटणे, पशु वैद्यकीय आधिकारी वाकतकर यांनी शवविच्छेदन केल्यानंतर सांगितले आहे. कोयना वन परिक्षेत्रात हा वन गुन्हा दाखल करण्यात आला असून,
या बिबट्याचे शवविच्छेदन दरम्यान काढण्यात आलेले अवयव वैद्यकीय तपासणीकरिता काढून घेण्यात आले आहेत. त्याची तपासणी झाल्यानंतर या बिबटय़ाचा मृत्यू घातपातामुळे की अपघातामुळे झाला हे स्पष्ट होणार असल्याचे कोयना वन परिक्षेत्र अधिकारी एस. पी. गोडसे यांनी स्पष्ट केले आहे.
कोयनेत असणारे घनदाट जंगल हे१९८५ पासुन सरंक्षित क्षेत्र म्हणून घोषित असल्याने या क्षेत्राला अभय मिळाले असे वाटू लागले असले तरी वन्यप्राणी गावातील शेतकऱ्यांच्या शेळयामेंढ्या आपले भक्ष्य बनवून पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. कधी कधी मानवावरही हल्ला करत आहेत.
कोयना विभागातील रासाटी, हेळवाक, शिरळ येथील घटना ताज्या आहेत. ज्या उद्देशाने हे क्षेत्र सरंक्षित केले तो उद्देश सफल झाला का, याबाबत प्रश्नचिन्ह आहे. जंगलातील प्राण्यांनी मानवी वस्तीकडे केलेली कुच व मानवाचे जंगलात होणारे अतिक्रमण या बाबी एकमेकास पूरक असल्याने सह्याद्रीत सैरभैर झालेले प्राणी भटकंती करुन आपल्याच जीवावर उठत असल्याचे या घटनेने स्पष्ट होत आहे.