पुणे – नवरात्रीमुळे फळांना मागणी वाढली आहे. त्यातच पावसामुळे चिकू, लिंबू आणि संत्राच्या भावात वाढ झाली आहे.
आवकेच्या तुलनेत मागणी कमी असल्याने कलिंगड, डाळींबाच्या भावात घट झाली आहे. मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे मोसंबी, अननस, पपई, पेरु, खरबूज आणि सिताफळाचे भाव स्थिर आहेत.
लिंबाच्या गोणीमागे 150 ते 200 रुपयांची वाढ झाली. संत्रा 10 ते 20 टक्के, चिकूच्या गोणीमागे 200 रुपयांनी वाढ झाली. तर डाळींबाचे भाव किलोमागे 5 ते 10 रुपयांनी घटले. तसेच, मोसंबीच्या भावातही 5 ते 10 टक्के आणि कलिंगडाचे भाव किलोमागे 2 रुपयांनी घटले.
रविवारी येथील बाजारात केरळ येथून अननस 3 ट्रक, मोसंबी 40 ते 50 टन, संत्री 25 ते 30 टन, डाळिंब 90 ते 100 टन, पपई 25 ते 30 टेम्पो, लिंबे एक ते दीड हजार गोणी, चिकू 1 हजार गोणी, कलिंगड 15 ते 20 टेम्पो, सिताफळ 15 ते 20 टन खरबुजाची 4 ते 5 टेम्पो आणि बोरांची 400 ते 500 गोणी इतकी आवक झाली.