पुणे – मार्गशीर्ष महिना सुरू असल्याने फळांना मागणी वाढली आहे. त्यातच थंडीमुळे उत्पादन घटल्यामुळे नेहमीच्या तुलनेत आवक कमी होत आहे. त्यामुळे मोसंबी, खरबूज, लिंबू, सिताफळ, बोरे, डाळिंब यांच्या भावात तेजी आली आहे.
हंगाम अंतिम टप्प्यात आल्याने गेल्या आठवड्याच्या तुलनेत मोसंबीच्या भावात 20 ते 30 टक्के, गोल्डन सिताफळाच्या भावात किलोमागे 20 रुपयांनी वाढ झाली. तर, आवक घटल्याने बोरांच्या भावात 15 ते 20 टक्के, लिंबाच्या गोणीमागे 100 ते 150 रुपये, खरबूज 10 टक्के, पपईच्या भावात किलोमागे 2 ते 3 रुपयांनी वाढ झाली. मगणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे उर्वरित फळांचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहेत.
रविवारी (दि. 27) मार्केट यार्ड येथील फळबाजारात केरळ येथून अननस 6 ट्रक, मोसंबी 20 ते 25 टन, संत्री 35 ते 50 टन, डाळिंब 20 ते 25 टन, पपई 30 ते 35 टन, लिंबे दीड ते दोन हजार गोणी, पेरु 25 टन, चिकू 20 टन, खरबूज 10 ते 20 टेम्पो इतकी आवक झाली.
फळांचे भाव
लिंबे (प्रति गोणी) : 250-450, अननस (डझन) : 70-270, मोसंबी : (3 डझन) : 250-450, (4 डझन) : 90-200, संत्रा : (10 किलो) : 100-300, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : 40-200, गणेश : 10-50, आरक्ता 20-80. खरबूज : 18-25, पपई : 8-15, चिकू ( 10किलो) 200-350, पेरू (10 किलो): 100-250, बोरे (10 किलो) चमेली : 150-160, उमराण : 50-70, चेकनट : 425-450, चण्यामण्या 480-520, सीताफळ : 40-130.