नगर -कडाक्याच्या उन्हाळ्यात दिलासा देणाऱ्या लिंबाच्या किंमती सध्या प्रचंड वाढल्या आहेत. फक्त नगरच नाही तर देशातच अशी परिस्थिती दिसून येत आहे. उन्हाळ्यात लिंबाला जास्त मागणी असते आणि नेमक्या याच काळात दर वाढल्याने सर्वसामान्यांचे बजेट अक्षरशः कोलमडले आहे. नगरमध्ये सध्या 200 रुपये तर काही ठिकाणी थेट 300 रुपये किलो दराने विक्री होत आहे.
किरकोळ बाजारात एक लिंबू घ्यायला गेले तर एक लिंबू 10 ते 15 रुपयांना मिळत आहे. फक्त लिंबू नाही तर महागाईमुळे अन्य भाजीपाल्याच्या किंमती देखील वाढल्या आहेत. सध्या देशात महागाई वेगाने वाढत आहे. कालच मार्च महिन्यातील किरकोळ महागाई अहवाल जाहीर झाला आहे. मार्च महिन्यात सुद्धा महागाईने आम आदमीला जोरदार झटका दिला आहे. मार्च महिन्यात किरकोळ महागाई दर 6 टक्क्यांपेक्षा जास्त राहिला आहे. इंधनाच्या दरात वेगाने वाढ होत आहे. त्यामुळे वाहतुकीच्या दरात वाढ झाली आहे. त्याचा परिणाम म्हणून देशांतर्गत महागाईत वाढ झाली आहे. या घडामोडींचा परिणाम भाजीपाला दरावरही दिसून येत आहे. किरकोळ बाजारात भाजीपाल्याचे दर वाढले आहे. यावेळी लिंबाने मात्र जरा जास्तच त्रास देण्यास सुरुवात केली आहे.
जिल्ह्यात श्रीगोंदा, श्रीरामपूर, राहाता तालुक्यात लिंबाच्या बागा मोठ्या प्रमाणात आहेत. येथील बाजार समित्यांमध्ये लिंबाचे लिलाव होतात. यावेळी मात्र उन्हाळ्यात लिंबाचे भाव वाढण्यास सुरुवात झाली. मार्च महिन्यात 85 ते 90 रुपये किलो भाव होते ते आता शंभर रुपयांच्याही पुढे गेले आहेत.
नगर जिल्ह्यात लिंबांना परराज्यातूनही मागणी असते. या राज्यांतून तसेच येथील नागरिकांकडूनही मागणी वाढली आहे. परंतु, पुरवठा तितका नाही. याचे कारण म्हणजे, यावेळी लिंबाचे उत्पादन कमी राहिले आहे. त्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. फेब्रुवारीमध्ये 25 ते 30 रुपये किलो दराने विकले जाणारे लिंबू आज 150 ते 200 रुपये किलो दराने विक्री होत आहेत.
महागाईच्या दिवसात भाजीपाल्याचे भाव वाढले आहेत. हिरवी मिरची तब्बल 150 रुपये किलो दराने विक्री होत आहे. बटाटा 20 रुपये किलो झाला.
सध्या महागाईने नागरिकांना प्रचंड हैराण केले आहे. पेट्रोल डिझेल, घरगुती गॅसच्या किंमती वाढल्या आहेत. त्यानंतर आता भाजीपाल्याचेही भाव वाढले आहेत. महागाई कमी करण्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न होणे गरजेचे आहे.
– सुनील काळे, नागरिक