प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 4 -“गणराया आपल राज्य सुफलाम सुफलाम होऊ दे,’ राज्यावरील सर्व संकट दूर कर आणि सामाजिक, राजकीय पर्यावरण आपल्याला पाहण्यास मिळू दे, हीच गणराया चरणी प्रार्थना असल्याची भावना शिवसेना नेत्या तसेच विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मानाच्या पाच गणपतीच्या दर्शनानंतर पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.
पुणे शहरातील मानाचा पहिला कसबा गणपती, दुसरा श्री तांबडी जोगेश्वरी गणपती, तिसरा गुरुजी तालीम मंडळ, चौथा तुळशीबाग गणपती मंडळ, मानाचा पाचवा केसरीवाडा, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती आणि अखिल मंडई गणपती मंदिरात जाऊन डॉ. गोऱ्हे, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी त्यांच्या कुटुंबियांसह दर्शन घेतले. यावेळी शिवसेना शहरसंघटक राजेंद्र शिंदे, माजी नगरसेवक विशाल धनवडे, उपशहरप्रमुख आनंद गोयल, राजू विटकर यांच्यासह आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी कसबा मंडळाचे मुरलीधर देशपांडे, दगडूशेठ गणेश मंडळाचे महेश सूर्यवंशी, हेमंत पवार, मंडई गणेश मंडळाचे संजय मते, जोगेश्वरी गणेश मंडळाचे राजाभाऊ टिकार, गुरुजी गणेश तालीम मंडळाचे राजु परदेशी, तुळशीबाग गणेश मंडळाचे नितीन पंडित, विनायक कदम, केसरीवाडा गणेश मंडळाचे रोहित टिळक, स्वप्नील पोरे, हेरंब ढेरे, अमोल घुमे, हेमंत पवार, अश्विनी शिंदे, अनिता परदेशी उपस्थित होते.