सातारा -सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या राज ठाकरेंना तात्काळ अटक करावी, या मागणीसाठी उपराकार लक्ष्मण माने यांच्यासह आम्ही सारे भारतीय लोक आंदोलन समितीचे पदाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषणास बसले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे देशाच्या जडणघडणीत काय योगदान आहे, त्यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांनी परिवर्तन चळवळीचे नेतृत्व केले. त्यांच्या विचारसरणीचा आदर्श त्यांनी घ्यावा.
घटनेने सर्व धर्मांना स्वातंत्र्य दिलेले आहे. सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या राज ठाकरेंवर प्रसंगी स्वतः गुन्हा दाखल करू, असा इशारा लक्ष्मण माने यांनी दिला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करून आजपासून आम्ही सारे भारतीय अशी राज्यव्यापी यात्रेस सुरुवात करण्यात येत आहे. हे अभियान महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने राबवणार असल्याचे त्यांनी सांगितले.